पुणे : माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून बघितले जाते. पत्रकारितेचे स्वातंत्र्य हेच लोकशाहीचे खरे मूल्य असून, त्याची चांगल्या प्रकारे जोपासना होत आहे. लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीने माध्यमांनी आपली विश्वासार्हता कायम राखावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सव शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात विशेष स्मरणीकेचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खा. अनिल शिरोळे आदी मान्यवर.पुणे पत्रकार संघाच्या अमृतमहोत्सवाचा शुभारंभ आणि त्यानिमित्त तयार केलेल्या स्मरणिकेच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे व खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते. पत्रकारितेचे माध्यम बदलत असून, नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत. याद्वारे चांगल्या-वाईट गोष्टींना खतपाणी घालण्याचे प्रकार वाढल्यामुळे या माध्यमांपुढे विश्वासार्हता जपण्याचे संकट निर्माण झाले आहे. सध्या या माध्यमांनी सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करण्याची गरज असून, ते रुजवण्याचे काम प्रामुख्याने पत्रकाराने केले पाहिजे.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या जाळ्यामध्ये वृत्तपत्रांनी आपले स्थान टिकविले आहे. परिस्थिती वेगाने बदलत आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून समाजाची शाश्वत मूल्ये जपण्याची गरज असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सोशल मीडिया हे खूप महत्त्वाचे साधन आहे. त्याचा वापर कशासाठी व कोणत्या पद्धतीने करावा याचा विचार होणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडिया प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला असल्याने त्याला किती महत्त्व दिले पाहिजे हे ठरविणे आवश्यक आहे. चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींसाठी त्याचा वापर वाढला असल्याने त्याच्या वापरावर निर्बंध हवा आहे. आपल्या देशात लोकशाहीला फार महत्त्व देण्यात आले आहे. इथे प्रत्येकाला बोलण्याचे, विचार मांडण्याचे व लिहिण्याचे स्वातंत्र्य संविधानाने बहाल केले आहे. दिलेल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग न करता त्याचा वापर चांगल्या कामांसाठी करणे व चांगल्या कामांचे कौतुक करणे हे वृत्तपत्रीय माध्यमांचे काम असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र बडदे यांनी प्रास्ताविक केले. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले.बातमीचे मूल्य तेव्हा कळले!सन २00३ मध्ये मला उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाला होता. त्यावेळच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सकाळी माझा सन्मान करण्यात आला. योगायोगाने त्याच दिवशी दुपारच्या सत्रात विधानसभेमध्ये विदर्भावर झालेल्या अन्यायाबाबत बोलत होतो. माझे मत मांडताना शेवटच्या क्षणी अत्यंत आवेगाने तत्कालीन राज्य कारभारावर टीका केली. त्यानंतर सभागृहात खूप गोंधळ निर्माण झाला. गोपीनाथ मुंडे यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झाले. दुसर्या दिवशी मला वाटले, मला पुरस्कार मिळाल्याची बातमी ठळकपणे येईल, मात्र दैनिके पाहताच धक्काच बसला. सर्व दैनिकांनी पुरस्काराची बातमी न देता सभागृहामध्ये झालेल्या गोंधळाची बातमी अत्यंत रंजकदार पद्धतीने दिली होती. तेव्हा मला बातमीच्या मूल्यांची प्रथमच जाणीव झाली.