नवी दिल्ली- पाकिस्तानने 26/11 मुंबई हल्ल्यातील आरोपी जकीउर रहमान लखवी याला जामीन मंजूर केला आहे. हे अतिशय धक्कादायक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले. लखवीच्या जामीनाविरोधात शुक्रवारी लोकसभेत प्रस्ताव देखील मांडण्यात आला. तसेच लखवीचा जामीन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. लखवीला जामीन मिळाल्याने भारताने तीव्र निषेध होत आहे. दरम्यान, भारताच्या तीव्र विरोधानंतर पाकिस्तानने लखवीला पुन्हा तुरुंगात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रचंड नाराजी व्यक्ती केली आहे. भारताने कठोर शब्दात पाकिस्तानाला संदेश पाठवल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले. पेशावरमधील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तान इतकी भारतालाही वेदना झाली. पेशावरमधील मृत निरागस मुले पाहून भारतातील प्रत्येक मुलाचे डोळे पानावले होते. पेशावरमध्ये झालेल्या हल्ल्याने मी देखील चिंतेत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
पंतप्रधान म्हणाले, 26/11च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी आणि लष्कर-ए-तैयबाच्या कमांडर जकी उर रहमान लखवी याला जामीन मिळणे, हे अतिशय धक्कादायक आहे. पेशावरमधील आर्मी स्कूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतासह अन्य देशांनी निषेध नोंदवला. मात्र, त्यानंतर लगेचच लखवी याला जामीन मंजूर करणे, ही पाकिस्तान भूमिका निंदनीय आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही लखवीला जामीन मंजूरीवर सवाल उपस्थित केला आहे. पाकिस्तान सरकारने आपला निर्णय तत्काळ बदलावा, अशी मागणी केली आहे.