पुणे :
शहरातील कचर्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी किशोरी गद्रे (व्यवस्थापकिय संचालक, ‘महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’, मुंबई) यांना पाचारण करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे ‘रिस्पॉन्सिबल रिसायकल इंडिया फाऊंडेशन’ चे ललित राठी, ‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’चे दीपक बिडकर, श्यामला देसाई (‘नॅशनल सोसायटीज फॉर क्लिन सिटीज्’), प्लास्टिक असोसिएशनचे प्रमोद शहा, ‘ग्रीनी’चे सुनील भोंडवे यांनी केली आहे. सध्या किशोरी गद्रे या ‘महाराष्ट्र टुरीझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (मुंबई) च्या व्यवस्थापकिय संचालक म्हणून कार्यरत आहेत.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची स्वयंसेवी संस्था असलेल्या ‘जनवाणी’ आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी 2011 साली कात्रज शून्य कचरा प्रकल्प राबविण्यात आला होता. त्यावेळी किशोरी गद्रे यांनी कचर्याचे नियोजन आणि कचर्याचे वर्गीकरण याविषयी जनजागृती निर्माण करून कात्रज शून्य कचरा प्रकल्प यशस्वीरित्या करून दाखविला होता.
या दरम्यान शहरातील कचरा समस्येचा पूर्ण अभ्यास किशोरी गद्रे यांनी केला. नागरिक, स्वयंसेवी संस्था, पालिका आणि उद्योगांच्या सहाय्याने कचरा मुक्तीचे यशस्वी मॉडेल कात्रजमध्ये उभारून दाखविले. त्यानंतरच प्रभागातील कचरा प्रभागात वर्गीकरण करता येतो हा विचार मूळ धरू लागला.
पुण्यातील कचरा समस्या गंभीर झाली असताना प्रत्येक प्रभागाात मूलभूत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करावी असे या पत्रकात म्हटले आहे.