आळंदीत महापूर; पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय
पुणे-आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्यामुळे आळंदीचा संपर्क तुटला असून आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांना आळंदीत न येण्याचे कडक आवाहन केले आहे. दुसरीकडे मुंबई-पुणे मार्गावरील दरड कोसळल्याने एसटी सेवा बंद करण्यात आली असून राज्यातील अनेक भागांत वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदीने रौद्ररूप धारण केले आहे. आळंदी शहरात प्रवेश करणारे चारही पूल पाण्याखाली गेल्याने शहरात ये-जा पूर्णपणे बंद झाली आहे. नदीकाठचे घाट, मंदिर परिसर, धर्मशाळा, दुकाने आणि अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेले आहेत.
आषाढी वारीसाठी देशभरातून आलेल्या शेकडो वारकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे २५० वारकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. नदीकाठी उभारण्यात आलेले चेंजिंग रूम आणि तात्पुरत्या सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
पूरस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन जारी केले आहे. आळंदीच्या दिशेने प्रवास करणाऱ्या सर्व वारकरी, भाविक आणि नागरिकांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि परिस्थिती सुरळीत होईपर्यंत आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
नदीपात्र, घाट, पूल किंवा पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवर जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

