पुणे :
‘भारत हा युवकांचा देश आहे. युवा पिढीच्या जोरावर हिंदुस्थान महासत्ता बनणार आहे. फक्त आवश्यकता आहे ती योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रांत सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे’, असे मत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले. कै.डॉ. वि. वि. (अप्पासाहेब) पेंडसे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त समितीच्या वतीने आयोजित‘भारत 2050 विश्वसत्ता’ या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते.
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, महाराष्ट्र नॉलेज फाऊंडेशनचे संचालक प्रा. विवेक सावंत, गोखले इन्स्टिट्यूटचे संचालक राजस परचुरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण अभ्यास विभागाचे प्राध्यापक डॉ. श्रीकांत परांजपे, संयोजन समितीचे ज्येष्ठ उद्योजक रामकुमार राठी, रवि पंडित, मराठा चेबरचे अनंत सरदेशमुख, माजी खासदार प्रदीप रावत, डॉ. अशोक कुकडे, राम कोल्हटकर, डॉ.सतीश देसाई, सुधीर गाडगीळ, ग्राहक पंचायतिचे सुर्यकांत पाठक, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, प्रा.राम डिंबळे, राजीव बसर्गेकर आणि मोहनराव गुजराथी आदी यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोहनराव गुजराथी यांनी केले, डॉ.गिरीष बापट यांनी आभार मानले.
डॉ. माशेलकर म्हणाले, भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप प्रगती केली आहे. अजूनही भारत प्रगतीच्या दिशेने पुढे जात आहे. काळानुसार बदलणे ही आजची गरज आहे. आपण महासत्तेकडे वाटचाल करतानास सर्व क्षेत्रांत उच्च तंत्रज्ञानाचा विकास आवश्यक आहे. आधुनिकीकरणात कोणीही मागे पडणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे. प्रगती जशी होईल तसे नागरिकांनी आपल्या मानसिकतेमध्ये बदल केले पाहिजेत.’
डॉ. देशमुख बदलती शिक्षण पद्धतीविषयी बोलताना म्हणाले, ‘आपल्या देशात विश्वविद्यालयांचे जाळे असूनही म्हणावी तशी आपली प्रगती नाही. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे महासत्तेकडे वाटचाल करताना शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. 2050 साली शिक्षण हे पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारित राहणार असून, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. 2050 साली भारतात ऑनलाईनच शिक्षण पद्धती येणार असल्याचे त्यांनी सांगितले.’
प्रा. सावंत म्हणाले, ‘महासत्ता होताना धर्म आणि राज्याची गल्लत होता कामा नये. सर्व समान बुद्धीमत्तेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. हिंदुस्थानची मूल्ये युवकांना दिल्यास महासत्तेकडे जाण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरेल. संस्कृतीचे सभ्यतेमध्ये प्रतिबिंब पाडावे लागेल, त्यासाठी सुशासनाची गरज आहे.
डॉ.राजस परचुरे म्हणाले, आपल्याकडे लष्कर आणि आर्थिक सत्ता आल्यास आपण महासत्ता होण्यास कोण रोखू शकत नाही. मात्र, त्यांचा उपयोग चांगल्या कामांसाठी होणे अपेक्षित आहे. आज अर्थसत्ता होताना देशातील जनता कमी प्रमाणात समाधानी आहे.’
‘भारत सध्या संयुक्त राष्ट्रसंघात कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी प्रयत्न करत आहे. मात्र भारताने पंडित नेहरू यांच्याप्रमाणे स्वतंत्र विचार दिला, तर भारत 2050 साली विश्वसत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. लष्करी सत्ता जोपर्यंत आपल्याकडे नाही, तोपर्यंत आपण विश्वसत्ता होऊ शकणार नाही ’असे प्रतिपादन डॉ. श्रीकांत परांजपे यांनी केले.