पुणे – धनगर माझा जीवन गौरव पुरस्काराने मी भारावून गेलो आहे. हा सन्मान माझा नसून दुष्काळी भागातील जनतेने दिलेल्या आशीर्वादाचा सत्कार आहे. असे भावपूर्ण उद्गार राजकारणातील भीष्माचार्य डॉ आ. गणपतराव देशमुख यांनी काढले.
पुणे येथील ऐतिहासिक अशा शनिवारवाडा पटांगणात आयोजित केलेल्या भव्य व नेत्रदीपक अशा धनगर माझा सन्मान सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९३ वी जयंती व धनगर माझाच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रामराव वडकूते, अॅड. रामहरी रूपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, माजी आमदार पोपटराव गावडे, गोपीचंद पडळकर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उत्तम जानकर, यशवंत सेनेचे माधव गडदे, आल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रवीण काकडे, ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर, प्रा.शिवाजी दळणर, राजू दुर्गे, घनशाम हाके,रासपाचे बाळासाहेब दोलताडे, उज्वलाताई हाके, अर्जुन सलगर, तुकाराम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तर कार्यक्रम संपताच जलसंधारण तथा राजशिष्ठाचार मंत्री प्रा. राम शिंदे यांनी उपस्थिती लावली. सिंधुदुर्ग येथील कार्यक्रम संपवून येत असताना वाहतुकीच्या प्रचंड गर्दीमुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगून शुभेच्छा व्यक्त केल्या.
एका गोष्टीची खंत
आज धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मात्र एका गोष्टीची खंत वाटते, कारण नसताना मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ नेत्याने कायद्यात दुरुस्ती न करता सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली. यावर जास्त टिप्पणी करणार नाही; मात्र, धनगर समाजाची फसवणूक करतात की काय अशी शंका येत असल्याची खंत ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांनी कार्यक्रमात व्यक्त केली. तसेच माझे उरलेले आयुष्य राज्यातील दुष्काळ हटवण्यासाठी आणि धनगर आरक्षण मिळण्याच्या प्रश्नासाठी आहे. यासाठी जे काही करावे लागेल ते उरलेल्या आयुष्यात करेल, असेही ते म्हणाले.
आ. रामहरी रूपनवर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रबोधन केले. त्यामुळे उपस्थित मंत्रमुग्ध झाले. तर आ. रामराव वडकुते व गोपीचंद पडळकर व स्वागताध्यक्ष उत्तम जानकर यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
तसेच यावेळी श्री. पांडुरंग पोले (IAS), श्रीमती संगीता धायगुडे (आयुक्त मालेगाव महानगरपालिका), श्री. रमेशशेठ लबडे(उद्योजक), श्री. ज्ञानदेव पडळकर(अधीक्षक अभियंता), श्री. अनिल विष्णू राऊत (क्षेत्र अधिकारी भूमापन), श्री. लहूजी शेवाळे (सरसेनापती, जय मल्हार सेना), श्री. मारुती दिगंबर येडगे (युवा उद्योजक), श्री. व सौ. वैशाली सुनील कुऱ्हाडे (अध्यक्ष, सुधाई सेवाभावी संस्था), सौ. साधना संभाजी गावडे (अध्यक्षा – ईश्वरकृपा शिक्षण संस्था) या सर्वांना समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच श्री व सौ जयश्री श्रावण वाकसे व युवा उद्योजक विवेक बिडगर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर मुंबईतील ऋणानुबंधग्रुपच्या वतीने बहारदार समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनगर माझाचे संपादक धनंजय तानले यांनी केले तर आभार गणेश खामगल यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासठी प्रतापराज मासाळ, राजेंद्र गाडेकर, विश्वनाथ साळसकर, रुक्मिणी धर्मे, मीना सूर्यवंशी, राहुल सुरवसे, गणेश पुजारी, आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात कार्य करणारा जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.