पुणे: आपले पुर्वज 100 वर्षे जगायचे, एवढे त्यांची प्रकृती चांगली असायची. निसर्गाशी पुर्वजांचे तेवढं नातं घट्ट असायचे. आज आपल्या पिढीने पर्यावरणाची वाट लावली, सामाजिक जीवनाची आपण वाट लावली. त्यामुळे युवकांनी कोणतीही कृती करताना आपल्या परिवाराचा, समाजाचा आणि पुढच्या पिढीचा विचार करुन कार्य करावे असे आवाहन माजी पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे यांनी केले.
जागतिक किसान दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली माय अर्थ फांउडेशन आणि पतित पावन संघटना कसबा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखा उपक्रम ‘आरोग्यउत्सव’ राबविण्यात आला. म्हात्रे पुल चौकातील तेंडूलकर उद्यानाजवळील महापालिकेच्या इंद्रधनु हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बर्गे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
गणेशोत्सव ते नवरात्रोत्सव काळात मंडळे आणि सोसायट्यांनी गोळा केलेल्या निर्माल्यापासून कंपोस्टखताची निर्मिती करण्यात आली होती. ते झाडांना प्रसाद म्हणून 200 गणेशोत्सव मंडळांना वाटप करण्यात आले. माजी पोलीस उपायुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते या कंपोस्ट खतरुपी झाडांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे पुणे मनपाचे पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, कचरा व्यवस्थापनतज्ञ ललित राठी, पतित पावन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, माय अर्थ फांउडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, योगेश वाडेकर, यादव पुजारी, विजय जोरी उपस्थित होते.