पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले गेले पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी देण्यात आली पाहिजे, असे माझे वयक्तिक मत आहे. पण त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘प्रत्येकाची मते ही वेगवेगळी आहेत. काही जणांना वाटते की, पुढचे 100 ते 120 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले गेले पाहिजे. मात्र अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशी बेफिकिरी योग्य नाही’ असेही पवार म्हणाले.अजित पवारांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना लसींच्या पुरवठ्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून लोकसंख्या लक्षात घेऊन कोरोना लस मिळायला हवी. मात्र, असे होत नाही. लस उपलब्ध होत नाही यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. जुलैमध्ये लस मिळेल असे केंद्राकडून सांगण्यात आले होते. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही’