पुणे-पीएमआरडीएवर आपटेंची निवड कशी झाली ? कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीवर ते कसे ? अश प्रश्नांनी कॉंग्रेस भवन मध्ये काल कॉंग्रेसचेच नेते निरुत्तर झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. काल प्रदेशचे आणि स्थानिक कॉंग्रेसच्या नेत्यांसह कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीत कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या कार्य पद्धती बद्दलच्या असंतोषाची ठिणगी पडली.आता हि ठिणगी वनवा पेटविणार कि विझून लुप्त होणार हे येत्या काळातच स्पष्ट होईल.काल कॉंग्रेस भवनात मात्र हि निवड राष्ट्रवादीच्या साहेबांनी केल्याचेही उत्तर ऐकायला मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.जनतेची कुठलीही कामे घेऊन न येता,करता,कॉंग्रेस भवनावर कधी न येता,भाजपा आणि अन्य पक्षांच्या नेतृत्वाबरोबर गुप्त कामांच्या निमित्ताने स्नेह भेट घेणारे तथाकथित कॉंग्रेसचे नेते (?) कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात आता खुपू लागले आहेत. अशा लोकांनीच कॉंग्रेसचे वाट्टोळे केल्याचा सूर आता उघड उघड उमटू लागला आहे. कुठवर आवाज दाबून ठेवणार ? याचा प्रत्यय आला आहे. काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षांना थेट सर्व कार्यकर्त्यांच्या सभेत हा प्रश्न विचारण्याचे धारिष्ट्य हि आता येऊ पाहते आहे. पीएमआरडीएवर महाविकास आघाडी सरकारने तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी एकाची निवड करण्याचे निश्चित केल्यानंतर कॉंग्रेसच्या वतीने कोणाची निवड झाली ? आपटे प्रदेशच्या कार्यकारणीत कसे? आणि त्यांची निवड कोणत्या पक्षाने केली ? कॉंग्रेसचा कोणता कार्यकर्ता पीएमआरडीए वर गेलाय ? अशा प्रश्नांची सरबत्ती काल कार्यकर्त्यांत धुमसत होती. राज्यात सत्तेत सहभागी होऊनही अनेक महामंडळे,सरकारी कमिट्या वर कोणा कोणा निष्ठावंतांची वर्णी लागायला हवी कोणा कोणाला संधी मिळायला हवी आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची पदे कोणाला द्यायला हवीत,ती कॉंग्रेसच्या वाट्याला आलीत काय ? जनतेची कामे कोणत्या माध्यमातून करायची ? रस्त्यांवर उभे राहून कॉंग्रेसचा झेंडा उंचावत घोषणा देत कुठ्वर पोलिसांची धक्काबुकी सहन करायची ?अशा विविध प्रश्नांनी त्रस्त झालेला कार्यकर्ता काळवंडलेल्या चेहऱ्याने का होईनात पण धर्मनिरपेक्ष पक्ष,ईंदिरा गांधी,महात्मा गांधींचा पक्ष म्हणून आजही कॉंग्रेस भवनात आपले नेते काय सांगतात हे ऐकायला उत्सुकतेने येतो.पण काल मात्र त्यातील एक कार्यकर्ता नेत्यांनाच निरुत्तर करून गेला,म्हणाला,त्याने कसब्यात आणि शिवाजीनगर मध्ये भाजपच्या उमेदवारांचे काम केले,कॉंग्रेसला उघडपणे माती चारली त्यालाच तुम्ही पदे देता. त्या क्षणी हे नाव राष्ट्रवादीच्या साहेबांकडून आल्याचा आवाज घुमला.यावेळी एका माजी महापौर,माजी आमदार असलेल्या नेत्यांनी मात्र आपटे यांची बाजू सावरण्याचा हि प्रयत्न केला,पण साहेब पुण्यात आल्यावर आपण कुणाच्या घरी जातो, तिथे कुणाला भेटतो याचा विचार करून,माहीती घेऊनच जायला हवे असाही सूर यावेळी कार्यकर्त्यांत होता पण तो अनेकांनी दाबूनच ठेवला.एकीकडे भाजपशी साटेलोटे ठेवत कॉंग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी सुपारी घेणारे कार्यकर्ते यांना मोठे करून कॉंग्रेस संपवू नका साहेब असाही सूर उमटत होता,पण शिस्तबद्ध पक्ष म्हणत,म्हणत हा सारा आवाज दाबला गेला पण विश्वासाने ‘माय मराठी ‘ पुढे मात्र उमटला.
कार्यकर्त्यांनी अशी सांगितली आपटेंची ओळख
आपटे हे एकेकाळी महापालिकेत सत्ता असताना गाजलेले,वजन असलेले नाव होते,एकही कार्यकर्ता सोबत नसताना केवळ जयंतराव टिळकांचा डोक्यावर हात असलेलं हे नाव,बहुधा जनतेतून कधी सार्वत्रिक निवडणूक न लढविलेले हे नाव.पण गाडगीळ आणि टिळक गटा तटाच्या राजकारणात केवळ टिळक नावावर चाललेल्या गटाचे हे म्होरके ज्यांचा १ च नगरसेवक होता त्यानेही उपमहापौर पद भूषविलेले, आणि आपटे यांनी सातत्याने पीएमटीवर आपल कित्येक वर्षे वर्चस्व अबाधित ठेवलेले.अगदी गाडगीळ गटाचे राजकारण संपले तरीही कलमाडींच्या काळातही आपटे नावाचा करिष्मा कायमच होता, तेव्हा पीएमटी अध्यक्षाचे ऑफीस महापौर दालनाला खेटूनच असायचे. आपटे यांच्यानंतर कोणीही अध्यक्ष झाले तरी आपटे यांचे वर्चस्व कायम असायचे.आयुक्तांपासून ते प्रत्येक अधिकारी आणि बड्या ठेकेदार कंपन्या आणि मुंबईतील आणि टिळकांकरवी दिल्लीतील अधिकाऱ्यांपर्यंत एक चतुर,आणि हुशार व्यक्ती (राजकारणी नव्हे)अशी ओळख आपटे यांची होती. आणि असे म्हणतात सध्याही काही अंशी हि ओळख अस्तित्वात आहे. तर हे जरी कॉंग्रेसचे असले तरी त्यांनी सत्ता बदलेल तशी वळणे स्वतःच्या आचरणात घेतली पण कॉंग्रेसचा हात हातातून न सोडता .