नाशिक -कोण म्हणते मुंडे भगिनी नाराज आहेत? उगाच बदनामी करू नका असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींना दिला आहे .आज ते नाशिक मध्ये कालिदास कलामंदिर येथे आयोजित सिटीलिंक नाशिक शहर बससेवा लोकार्पण सोहळ्यास ते आले तेव्हा वार्ताहरांशी बोलत होते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला. बुधवारी 43 जणांनी राष्ट्रपती भवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदीच्या मंत्रिमंडळामध्ये 36 नवे चेहरे सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे 12 विद्यमान मंत्र्यांनी राजीनामे दिले आहे. तर महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये प्रीतम मुडेंनाही स्थान मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र प्रीतम मुडेंना मंत्रिपद देण्यात आले नाही. यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत. आता चर्चांवर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश नसल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहेत, या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भडकले असल्याचे पाहायला मिळाले. ते म्हणाले की, कोण म्हणते मुंडे भगिनी नाराज आहेत. तुम्हाला कुणी सांगितले? असा सवाल करतानाच उगाच काहीही बदनामी करू नका असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. देवेंद्र फडणवीस आज नाशकात आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंडे भगिनींविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस पुढे म्हणाले की, ‘कृपा करून कारण नसताना त्यांना बदनाम करू नका. भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेत्यांकडून घेतले जात असतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे सांगून त्यांची विनाकारण बदनामी करू नका असे फडणवीस म्हणाले.