पुणे- जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ईडी कारवाई आणि विविध विसायांवर , आरोपांना आज पुण्यातील पत्रकार परिषदेतून उत्तरे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ..पहा नेमके ते काय म्हणाले ….
महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. ईडीकडून येथे झालेल्या कारवाईशी माझा काहीही संबंध नाही, असेही ते म्हणाले.
जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी कारखाना होता.
मात्र, महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने त्या कारखान्याचा लिलाव करण्यात आला. नंतर तो कारखाना खासगीरित्या विकत घेतला गेला. सध्या अजित पवारांचे निकटवर्तीय हा कारखाना चालवत होते. त्यामुळे आता अजित पवारांचीही ईडी चौकशी होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तरे देत या कारखान्यासंदर्भात इतंभू माहिती दिली.
ईडीकडून गुरू कमॉडिटीसंदर्भात काही चौकशा सुरू आहेत, त्यामुळे त्यांनी या कारखान्याची माहिती घेतली. मात्र, सध्या हा कारखाना जरंडेश्वरद्वारे चालविला जात आहे. गुरू कमोडिटीचे मुंबईतील ओंकार असं काहीतरी त्यांचं नाव आहे. त्यांच्या कंपनीशी माझा दुरान्वये संबंध नाही, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं आहे. आम्हाला पण प्रपंच, परिवार आहे. जरंडेश्वरच्या डायरेक्टरने ईडीच्या ऑफिसरला सर्वकाही दाखवलं आहे. नियमाच्या आधीन राहूनच या कंपनीला कर्जवाटप करण्यात आलं आहे. आम्ही यापूर्वी काही कंपन्यांवर डायरेक्टर होतो, पण डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी देशातील सर्वच मंत्र्यांना एखाद्या कंपनीच्या डायरेक्टरपदी न राहण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी, आम्ही ते पद सोडून दिले, असेही अजित पवार यांनी सांगितलं.
उच्च न्यायालयाच्या आदेशाने कारखान्याची विक्री
मुंबई उच्च न्यायालयाने हा कारखाना विक्रीस काढला होता, त्यामुळे तो बळकावण्याचा विषयच नाही. माझ्यावर यापूर्वीपासूनच असे आरोप झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वात जास्त किंमतीला जरंडेश्वर साखर कारखाना विकला असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. 12 ते 15 कंपन्यांपैकी मुंबईतील गुरू कमोडिटी या कंपनीने जादा दराने 65 कोटी 75 लाख रुपये दराने टेंडर भरल्यामुळे हा कारखाना या कंपनीला विकला गेला होता.
राजेंद्र घाडगे सध्या कारखाना चालवतात
बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड यांनी गुरुशी संपर्क साधून हा साखर कारखाना चालवायला घेतला. पहिल्याच वर्षी त्यांना जवळपास 4 ते 5 कोटी तोटाच झाला. त्यामुळे, माझे नातेवाईक आहेत, राजेंद्र घाडगे यांनी हा कारखाना चालवायला घेतला, त्यांनाही 2 वर्षे तोटाच झाला. त्यानंतर, त्यांनी बँकांशी चर्चा करुन रीतसर परवानग्या घेऊन कर्ज काढून विस्तारवाढ केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. जरंडेश्वर साखर कारखाना न्याय मागण्यासाठी संबंधित ठिकाणी जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.
३१ ऑगस्टपर्यंत लसिकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न
पवार म्हणाले,राज्यातील लसीकरण मोहीम वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, मात्र, लसींचा पुरवठा हा कमी जास्त प्रमाणात होत आहे. तसेच लसींचा पुरवठा फक्त महाराष्ट्रासाठीच नसून इतर राज्यांना देखील तो केला जात आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असण्याची शक्यता आहे. लसींचा पुरवठा जर सुरळीत राहिला तर ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
पवार पुढे म्हणाले, पुणे, पिंपरी चिंचवड तिसऱ्या टप्प्यात आणि ग्रामीण भाग चौथ्या टप्प्यात आहे. मात्र, आता ग्रामीण भागातील निर्बंध शिथिल करण्याचे संकेत अजित पवारांनी दिले. तसेच पुण्यातील लसीकरणाची मोहीम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, लसींच्या पुरवठ्यात सातत्य नसल्याने काही अडचणी येत आहे. तरीदेखील लसीकरण पूर्ण करण्यात येईल