विद्येच्या माहेरघरी दोन वर्षात महानगरपालिकेच्या शाळेतून तीन हजार मुले ड्रॉप आऊट
ड्रॉप आऊट झालेली मुले शोधून त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणावे
पुणे- महानगरपालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी तीन हजार विद्यार्थी गेल्या दोन वर्षात ड्रॉप आऊट झाले असून या विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडले एवढेच नव्हे तर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताना शाळा सोडलेला दाखल्याची गरज असते तो देखील त्यांनी पूर्वीच्या शाळेतून घेतलेला नाही. हे ड्रॉप आऊट विद्यार्थी आज नक्की कोठे आहेत? काय करीत आहेत? याची कोणतीही माहिती पुणे महानगरपालिकेकडे नाही. ही गंभीर बाब असून यासाठी ड्रॉप आउट विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी व्हावे आणि ही ड्रॉप आऊट झालेली मुले गुन्हेगारीकडे वळू नयेत यासाठी त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे. त्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये अशा ड्रॉप विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण व नाईट स्कूल सुरू करण्याचा संकल्प केला असल्याचे पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागूल यांनी सांगितले.
ते म्हणाले की शहरातील गरीब पालकांच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिळावे या हेतूने पुणे महानगरपालिकेच्या सुमारे तीनशे शाळांमधून शिक्षण दिले जात आहे. पूर्वी ह्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या एक लाखापर्यंत होती. ती कमी होत आता 60 ते 70 हजारापर्यंत आली आहे. मात्र इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी अन्य शाळांमध्ये जाणे किंवा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणे अपेक्षित असताना घेतलेल्या अधिकृत माहितीनुसार गेल्या दोन वर्षात सुमारे तीन हजार विद्यार्थी ड्रॉप आऊट झाले आहेत. विध्येच्या माहेरघरी एवढ्या मोठ्या संख्येने गरिबांची मुले ड्रॉप आऊट होत आहेत. हीअतिशय गंभीर बाब असून या मोठ्या प्रश्नाकडे साऱ्या शहराने, शिक्षण तज्ज्ञाने, राजकीय पक्षांनी लक्ष वेधले पाहिजे व ड्रॉप आऊट विद्यार्थी शोधून त्यांना पारंपारिक पद्धतीने शिक्षण देणे किंवा कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे गरजेचे बनले आहे. हा विषय गंभीर यासाठी आहे की, सातवीनंतर या विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्यास त्यांचे भवितव्य काय असणार आहे? त्यांना चांगला रोजगार कसा मिळू शकेल? काहीच नाही तर ते गुन्हेगारीकडे वळण्याची भीती आहे. या सर्व बाबींचा विचार करून असे विद्यार्थी ड्रॉप आऊट होणार नाहीत यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत. इयत्ता दहावी नंतरचे ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांची वारंवार माहिती मागूनही अधिकृत माहिती मिळत नाही. हे प्रमाण देखील मोठे असेल हे लक्षात घेऊन राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये अशा ड्रॉप आऊट विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र किंवा रात्रीच्या वेळेमध्ये ड्रॉप आउट मुलांची शाळा सुरू करण्याचा संकल्प आबा बागुल यांनी केला आहे.
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व प्रभागांमध्ये अशा प्रकारचे मॉडेल उभे करावे व ड्रॉप आऊट विद्यार्थी शोधून त्यांना चांगला रोजगार मिळेल यादृष्टीने कौशल्य विकास प्रशिक्षण द्यावे असे आवाहन आबा बागुलांनी केले आहे.
पुण्यातील अनेक शिक्षणतज्ज्ञ, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी, याचबरोबर शिक्षणाबद्दल आस्था असणारे निवृत्त शिक्षक अशा सर्वांची या संदर्भात एक बैठक आयोजित करून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल याचाही मी विचार केला असून या संदर्भात लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने विद्यार्थी आले किंवा येत नाहीत याची माहिती घेऊन ड्रॉप आऊट झालेली मुले शोधून,त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणावे किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिल्यास आपण चांगला नागरिक तयार करू भविष्यात हे देखील पुणेकर नागरिक असणार आहेत. त्यांचे भविष्य चांगले करणेसाठी त्यांचा पाया मजबूत करणे ही देखील आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन याचा तातडीने विचार करून कृती कार्यक्रम आखावा असे आव्हान मी महानगरपालिका आयुक्तांना करत आहे.अन्यथा दिव्याखाली अंधार अशी म्हण विद्येच्या माहेरघरी होईल. गरिबांची दोन-तीन हजार मुले ड्रॉप आऊट होतात. तरी कोणाचे लक्ष नाही. ती मुले काय करतात कोणाला माहित नाही. आणि वर्षानुवर्ष हे पुढे असेच चालू राहणार हे थांबवायचे असेल तर वेळीच सावध होऊन आत्ताच सुरुवात केली पाहिजे यासाठी राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये पथदर्शक सुरुवात आम्ही करीत आहोत. ज्यांना ज्यांना अशा ड्रॉप विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यांनी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कूल मध्ये संपर्क करावा. आपल्या पाल्याचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना हातभार लावा असे आवाहन आबा बागुलांनी केले.