वाहतुकीचा प्रश्न गंभीर;पालिका प्रशासनाला सुचविल्या प्रभावी उपाययोजना
पुणे
सध्यस्थितीत शहराचा वाहतुकीचा गंभीर बनलेला प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर तातडीने स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनरची नियुक्ती करून पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
यासंदर्भात आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे की,
भविष्याचा विचार करता आतापासून आपल्याला वाहतूक नियोजनासाठी पाऊले उचलावी लागणार आहेत.
त्यासाठी
शहराच्या वाहतुकीबाबत नियोजनाचा मास्टर प्लॅन तयार असणे अनिवार्य आहे. मात्र सद्यस्थितीत बिकट बनलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना प्रभावीरीत्या राबविल्यास वाहतूक कोंडीतून पुणेकरांना दिलासा मिळणे सहजशक्य आहे.
सध्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदार, विद्यार्थी अशा सर्वांचे हाल होत आहे. वेळेचा अपव्यय होत असल्याने मनस्तापाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यात या प्रश्नावर पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि अनास्था यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न जटिल होत असल्याच्या वास्तवाकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.
सध्या शहरात होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अरुंद रस्त्यांसह शहरातील सर्वच रस्त्यांवर चार चाकी वाहनांना पार्किंगला अटकाव घालणे, वाहतूक नियंत्रक दिव्यांचे सुसूत्रीकरण करणे, अतिक्रमण विरहित फुटपाथ, रस्ता रुंदीतील जागा ताब्यात घेऊन रस्ते विकसित करणे, प्रत्येक चौकात दोनशे मीटर अंतरावर गतिरोधक उभारणे, रस्त्यात बंद पडलेल्या वाहनांना घेऊन जाण्यासाठी क्रेनची व्यवस्था सक्षम करणे, चोवीस तास वाहतूक नियंत्रक दिवे सुरु ठेवण्यासाठी वीज बॅटरी बॅकअप यंत्रणा प्रभावी करणे, जिथे आवश्यक,त्या ठिकाणी एकेरी मार्गाची आखणी करणे, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर वाहनतळांची निर्मिती करणे आदी विविध उपाययोजना माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाला सुचविल्या असून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षाही व्यक्त केली आहे.
सद्यस्थितीत शहराला ट्रॅफिक प्लॅनरच नसल्याने,तातडीने मुख्य ट्रॅफिक प्लॅनरची नियुक्ती करून त्यांच्या नियंत्रणाखाली पंधरा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र ट्रॅफिक प्लॅनर नेमावेत आणि प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर पोलिसांच्या मदतीने सुरळीत वाहतुकीची जबाबदारी त्या त्या ट्रॅफिक प्लॅनरवर सोपवावी असेही आबा बागुल यांनी म्हटले आहे.