नवी दिल्ली, 24 जुलै 2021
केंद्रीय सांस्कृतिक आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रात (आयजीएनसीए) “आझादी का अमृत महोत्सव” चा भाग म्हणून अमर शहीद चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर आधारित “आझाद की शौर्य गाथा” प्रदर्शनाचे काल उद्घाटन केले. आयजीएनसीएतर्फे साजरा होत असलेल्या तीन दिवसीय ‘कलाकोष प्रतिष्ठान दिवस’ सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी काल पुस्तके व माहितीपटही प्रसिद्ध करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयजीएनसीए ट्रस्टचे अध्यक्ष राम बहादुर राय होते. यावेळी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.हरे राम त्रिपाठी; आयजीएनसीएचे सदस्य सचिव डॉ. सच्चिदानंद जोशी; कलाकोष विभागाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जटू व इतर पाहुणे उपस्थित होते.संस्कृती राज्यमंत्री याप्रसंगी म्हणाले की, “आझादी का अमृत महोत्सव” च्या माध्यमातून देशातील युवा पिढीला स्वातंत्र्यलढ्यात किती लोक शहीद झाले हे कळेल. स्वातंत्र्यलढ्यात दुर्बल घटकातील मोठ्या संख्येने शहीद झाले होते ,ज्याचा उल्लेख इतिहासात कधीही करण्यात आला नाही असे ते म्हणाले .राम बहादुर राय आपल्या भाषणात म्हणाले की, 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला असला तरी 1857 मध्ये स्वातंत्र्यलढ्यावर महत्त्वपूर्ण भर देण्यात आला होता. म्हणूनच ही दोन्ही वर्षे आणि त्या दरम्यानचा काळ अतिशय महत्वाचा आहे.डॉ. सच्चिदानंद जोशी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की, सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने ” आझादी का अमृत महोत्सव ” साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि या मालिकेचा एक भाग म्हणून ‘आझाद की शौर्यगाथा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.