- मासिक पाळी येऊ लागताच २३ टक्के मुली शाळेत जाणे सोडून देतात
- महिलांमध्ये मासिक पाळीबाबत योग्य जागृती ही काळाची गरज
- करिश्मा केअर फाऊंडेशन ग्रामीण महिला व मुलींना मोफत सॅनिटरी पॅड वाटणार
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात केलेल्या एका आरोग्य सर्वेक्षणानुसार ११ ते १९ वयोगटातील शालेय व महाविद्यालयीन मुली त्यांच्या मासिक पाळीदरम्यानच्या कालावधीत म्हणजेच वर्षभरातील एकूण ५० ते ६० दिवस शाळा बुडवतात ज्याचा दुष्परिणाम त्यांचे आरोग्य व शिक्षण या दोन्हींवर होतो.
भारतभरातील महिलांसाठीच्या स्वच्छता सुविधांवर प्रसिद्ध झालेल्या वर्ष २०१६ च्या अहवालातून पुढे आलेल्या माहितीनुसार वयात आलेल्या सुमारे ६.३० कोटी मुली शौचालयाची सुविधा नसलेल्या घरांत राहतात आणि २३ टक्के मुली मासिक पाळी येणे सुरु झाल्यावर शाळेत जाणेच सोडून देतात. शाळा सोडण्यामागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे शाळांमध्ये असलेली स्वच्छतागृहाची कमतरता. भारतात या नैसर्गिक जीवशास्त्रीय प्रक्रियेभोवतीचे लांच्छन इतके प्रचंड आहे, की मासिक पाळी हा शब्दही मोठ्याने उच्चारलेला ऐकू येत नाही.
या इशारादर्शक आकडेवारीतूनच एका उदात्त पुढाकाराचा उदय झाला आहे. आजच्या मासिक पाळी आरोग्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मुली व महिलांना मोफत सॅनिटरी पॅड्स पुरवण्याच्या हेतूने करिश्मा केअर सॅनिटरी पॅड्स सादर करण्यात आली.
हा प्रकल्प खेड्यांतील व झोपडपट्ट्यांमधील ग्रामीण महिला व मुलींच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या करिश्मा केअर फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने राबवला आहे. करिश्मा केअर सॅनिटरी पॅड्स ही जैव-विघटनशील, पर्यावरण-सुरक्षित, सुगंधरहित व अतिनील संरक्षित आहेत. ही पॅड्स महाराष्ट्रील व शेजारच्या राज्यांतील महिलांनी महिलांसाठी बनविली आहेत आणि त्यातून त्यांना आर्थिक मदतही होणार आहे. ही पॅड्स ग्रामीण महाराष्ट्रातील महिला व मुलींना मोफत वाटली जाणार आहेत.
करिश्मा केअर पॅड्स बनवण्याचे काम त्यांची निर्मिती करणाऱ्या महिलांकडे सोपवण्यात आले आहे. ही पॅड्स विविध स्वयंसहाय्यता गटांकडून त्यांना आर्थिक मदत होण्याच्या दृष्टीने खरेदी केली जातात आणि निर्मिती केंद्रांना भेट दिल्यावर व परवान्याची पडताळणी केल्यानंतरच ही खरेदी होते.
यासंदर्भात पुण्याच्या पॅडवूमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, तसेच करिश्मा केअर फाऊंडेशनच्या संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त नीलम तुतेजा म्हणाल्या, “गेली तीन वर्षे आम्ही महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात शेकडो खेडेगावांना व शाळांना भेट देत आहोत. आम्ही ग्रामीण भागात अनेक धर्मादाय पुढाकार राबवत आहोत, जसे मराठवाड्यातील दुष्काळ प्रभावित भागांत अन्नधान्याचे वाटप, जवळपास दहा हजार मुलांना वह्या व लेखन साहित्याचे वाटप, बीडमधील आम्ही दत्तक घेतलेल्या व शैक्षणिक खर्च प्रायोजित केलेल्या ३०० मुलींना साह्य, वृक्षारोपण, आरोग्य शिबीरे, समुपदेशन सत्रे आणि विधवा व ग्रामीण महिलांना सल्ला व साह्यासाठी राबवला जाणारा केशक्ती हा प्रकल्प आदींचा त्यात समावेश आहे.
ग्रामीण महिला व मुलींसाठीच्या या विविध सल्ला सत्रांमध्ये मला असे दिसून आले, की अनेक मुली त्यांच्या मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या समस्येमुळे शाळेतच जात नाहीत आणि त्यांच्याकडे सॅनिटरी पॅड्स खरेदी करण्यासाठीही पैसे नसतात. यामुळे शाळेतील त्यांच्या एकंदर उपस्थितीवर परिणाम होतो. अनेक महिलांना शेतात काम करत असताना विविध समस्या जाणवतात. त्यातील काहींमध्ये तर अयोग्य शरीर स्वच्छतेमुळे पूर्वी अनेक आरोग्य समस्या उद्भवल्या. मी महाराष्ट्राच्या अंतर्भागात प्रवास करत असताना १०० हून अधिक खेडेगावांना भेटी दिल्या तेव्हा मला स्वतःलाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. यातूनच या महिलांना मोफत सॅनिटरी पॅड्स पुरवण्याची कल्पना मला सुचली.”
त्या पुढे म्हणाल्या, “ आम्ही उत्पादकांच्या कारखान्यांना भेट दिली. आम्ही देणार असलेली पॅड्स अतिनील संरक्षित (यूव्ही प्रोटेक्टेड) असून त्यांचे पॅकेजिंगही अत्यंत काळजीपूर्वक हातमोजे घालून मगच केले जाते. आम्ही आणखी काही निर्मिती केंद्रांना सहभागी करुन घेणार आहोत व लवकरच आमचे स्वतःचे निर्मिती केंद्र सुरु करण्यापूर्वी या उत्पादकांना उत्पन्न निर्मितीसाठी मदत करणार आहोत. उत्पादकांकडून ही सॅनिटरी पॅड्स खरेदी करण्याचा खर्च भागवण्यासाठी आम्हाला देणग्यांची अपेक्षा आहे, जेणेकरुन ही पॅड्स बीड, जौहर आणि इतर गावे व झोपडपट्ट्यांतील आम्ही दत्तक घेतलेल्या ३०० मुलींना सहजपणे वितरित करता येतील. आम्ही ही मदत एकदाच करुन थांबणार नाही तर ती सातत्याने निरंतर तत्त्वावर केली जाईल. म्हणूनच आम्हाला या उपक्रमाला मदतीसाठी देणग्यांची गरज आहे.”
ग्रामीण भागातील मुलींचे वैयक्तिक शरीर आरोग्य व सुरक्षेच्या, तसेच उन्नतीच्या दिशेने ही निःसंशय एक मोठी झेप ठरेल. दानशूर व्यक्तींकडून भरघोस प्रतिसाद मिळावा असाच हा उदात्त उपक्रम आहे.