मुंबई -एकीकाकडे पुण्यात येऊन उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन डोस घेतलेले असतील तरीही निर्बंध पाला असे म्हणत असले तरी दुसरीकडे कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांतून सूट देण्याबाबत मुंबई महा पालिका विचार करू लागली आहे.
15 जुलै रोजी राज्य शासनासोबत होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी दर सध्या दोन टक्के आहे. मात्र येणारे सणासुदीचे दिवस आणि तिसऱया लाटेच्या इशाऱ्याने मुंबईचा समावेश लेव्हल तीनमध्येच आहे. यानुसार मुंबईतील निर्बंध काही अंशी शिथिल करण्यात आले आहेत.
- ज्यांनी दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना रेल्वे वगळता इतर ठिकाणी सवलत देण्याबाबतचा विचार पालिकेकडून केला जात आहे.
- दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधांमधून सूट द्यावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेनेही कार्यवाही सुरू केली आहे.
12 लाख मुंबईकरांनी दुसरा डोसही घेतला
कोरोना रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. आतापर्यंत मुंबईत 59 लाख 29 हजार नागरिकांनी लसीचे डोस घेतले आहेत. यात 46 लाख 81 हजार 780 लोकांनी पहिला ड़ोस घेतला आहे, तर दुसरा डोस 12 लाख 47 हजार 410 नागरिकांनी टोचून घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशा नागरिकांना कार्यालये व इतर ठिकाणी प्रवेशासाठी सवलत देण्याबाबत विचार सुरू आहे.