पुणे- महापालिका आयुक्त हे राज्य सरकारच्या दबावाखाली काम करतात आणि त्यामुळेच त्यांनी महापौरांना प्रतिवादी केलेल्या खटल्यात महापौरांच्या वतीने वकील कोर्टात उभा राहू दिला नाही अशा सभागृह नेत्यांच्या प्रहारावर प्रती प्रहार विरोधीपक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केला आहे.
त्या म्हणाल्या ,’ महापालिकेत कायदा सल्लागार ,विधी सल्लागार कार्यालय आहे वकिलांचे पॅॅनेल ही आहे. या खात्याचे प्रमुख यांचे कामच आहे महापालिकेच्या वतीने आपली ‘योग्य ‘बाजू कोर्टात मांडायची, महापौरांची देखील’ योग्य ‘ बाजू ते मांडू शकतात , ….पण वकिलीची सनद घेताना निरपराधांना कोर्टात कायद्याचा आधार निर्माण करून देईल आणि अपराध्यांना सजा मिळवून देईल हि प्राथमिक प्रतिज्ञा दिली जाते . सनदी अधिकारी, पोलीस यांनाही अशी प्रतिज्ञा घेऊनच सनद घ्यावी लागते .हे बहुधा सभागृहनेते विसरले असावेत . त्यांनी उद्या शनवार वाडा विकायचा ठराव बहुमताच्या जोरावर मंजूर केला आणि त्याविरोधात कोणी कोर्टात गेले तर महापालिकेचे विधी सल्लागार विभाग त्यांची बाजू मांडायला कोर्टात जाईल काय ? या प्रश्नाचे उत्तर नाही, असेच आहे. सत्ताधारी मंडळीनी बेकायदेशीर काम केले तर त्यासाठी महापालिकेचे विधी कार्यालय किंवा आयुक्त कधीच कोर्टात त्यासाठी वकिली करायाला कोणाला पाठविणार नाही त्यांची वकिली त्यांनाच करावी लागेल ,सत्ताधारी यांनी महापालिकेच्या स्थायी समितीत केलेला प्रस्ताव हा केवळ राज्य सरकारच्या विरोधात नाही तर तो चुकीचा कायदा सोडून केलेला प्रस्ताव आहे हे माहिती असल्याने आयुक्त किंवा विधी सल्लागार कार्यालय या प्रस्तावाचे समर्थन करूच शकत नाहीत, तर ते कोर्टात अशा चुकीच्या गोष्टींची वकिली करायला कसे उभे राहतील ? राज्य सरकारने आपल्या अधिकारांची मर्यादा, कायदेशीर बाजू तपासूनच २३ गावांच्या आराखड्या संदर्भात जे काही केलेत ते निर्णय केलेले आहेत . आणि राज्य सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न जो भाजपाने चालविला आहे ,( महापालिका प्रशासनाने नव्हे ) त्याला भाजपनेच पेलवण्याचा प्रयत्न करावा केवळ महापौर या पदाचे कारण पुढे करून बेकायदा बाबीसाठी देखील महापालिकेचे वकील आपल्यासाठी लढतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.आणि महापालिकेचे वकील महापौर म्हणून नव्हे तर बेकायदा प्रस्ताव म्हणून यामागे उभे राहिलेले नाहीत हे लक्षात घ्यावे . आणि म्हणूनच महापालिकेच्या पैशातून देखील अन्य कोणी वकील उभा कार्याचा प्रयत्न देखील बेकायदा ठरेल तेव्हा एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक अशी पद्धत न वापरता महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आपापली राजनीती ची बोथट हत्यारे टाकून देऊन जनहितासाठी ,पुणेकरांच्या भल्यासाठी काम करावे असे आव्हानही दिपाली धुमाळ यांनी केले आहे .