पुणे: मुळात वाचायचे नाही,डोकी भडकावत राहायचे आणि हेच हवय यांना ,जातीय राजकारणासाठी एजंट नेमले गेलेत ,त्या एजंटचे कामच आहे हे ‘ या शब्दात ‘ब्रिगेड ‘वर राज ठाकरेंनी आज प्रहार केला ते म्हणाले , फक्त मतदानासाठी या गोष्टी केल्या जातात मतदारांच्या भल्यासाठी नाही .तर शरद पवारांना टोला मारताना राज ठाकरे म्हणाले ,मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाण हि वाचलेत ‘ आज पुण्यात झालेल्या राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने पवार आणि ब्रिगेड या विषयावर भाष्य झाले .
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच जातीवादाचा मुद्दा प्रखरतेने समोर आला असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका कार्यक्रमात मांडले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल अशी मला खात्री आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावर आज मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलं आणि यशवंतराव चव्हाण देखील वाचलेत . असा टोला दिला . महाराष्ट्र जातीपातीच्या विचारातून बाहेर येणं गरजेचं आहे, हा वक्तव्यमागचा अर्थ होता, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच पवारांच्या भेटीला जातो, तेव्हा मराठा म्हणून जात नाही,आणि पुरंदरेंच्या भेटीला जातो तेव्हा ब्राम्हण म्हणून जात नाही असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. पण अलीकडे जातीचं वातावरण तयार करण्यात येत आहे,नरेंद्र मोदींनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली ,जातीच्या नाही , विकासाच्या मुद्द्यावर लोक मतदान करतात ना ? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला .
दूसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. जातीचा मुद्दा त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात जातीचा मुद्दा हा सर्वांथाने मोठा झाला असेल, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? असं राज ठाकरे यांनी म्हटलं .जातीय राजकारण करून मते मिळविता येतील पण पुढे काय ?फक्त मतदानासाठी या गोष्टी केल्या जातात , मतदारांच्या भल्यासाठी नाही , निव्वळ २ /३ टाळकी त्यातून निवडून येतात . असेही ते म्हणाले नेमके राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत काय म्हटले ते ऐका नेमके त्यांच्याच शब्दात …
शरद पवारांना दिलं सडेतोड उत्तर
मी प्रबोधनकारांची पुस्तकं आणि यशवंतराव चव्हाण पण वाचलेत. मी जे बोललोय त्याच्याशी आजोबांचं काय संबंध? असं राज ठाकरेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय. १९९९ सालानंतर जातीपातींमधला द्वेष वाढला, असं वक्तव्य मी केलं होतं. या सगळ्याबाबत राज ठाकरेंनी प्रबोधनकार वाचावेत, असं त्यांनी म्हणण्याचा अर्थच मला कळला नाहीये.
मराठ्यांना आरक्षण देणार नसाल तर सरळ सांगा
जातीपातीच्या मुद्द्यातून महाराष्ट्राने बाहेर येणं गरजेचं आहे. गेल्या १५-२० वर्षांपासून मित्रांमध्ये, शाळा-कॉलेजेसमध्येही जातीपातीचे विचार आले. पत्रकारांमध्येही हल्ली जात डोकावत आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्या महाराष्ट्राची अशी अवस्था चिंताजनक आहे. मराठा बंधू-भगिनींनी मोर्चे काढले, आंदोलने केली. पण हे मोर्चे कशातून निघाले? कले निघाले? जर त्यांना आरक्षण मिळणार नसेल तर त्यांना तसं स्पष्ट सांगा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांची माथी भडकवून केवळ या निवडणुकीला मत मिळतील. पण पुढे परिस्थिती गंभीर आहे”, अशी रोखठोक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या उदयानंतरच जातीचं राजकारण वाढलं
राज ठाकरेंनी मागे केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. १९९९ सालानंतर जातीपातींमधला द्वेष वाढला, या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात जातीय द्वेष हा राष्ट्रवादीच्या उदयानंतर वाढला आहे. दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादीच्या जन्मानंतर वाढला, हे सगळ्यांनाच माहितीय, असंही त्यांनी म्हटलंय.
प्रबोधनकार तुम्हालाही परवडणार नाहीत
ते म्हणाले की, मी काय वाचतो आणि मी काय वाचलंय, हे माझं मला, माझ्या पक्षाला आणि लोकांना माहितीय. मला मोजायचा प्रयत्न करु नये. मी आजोबांचं सगळं वाचलंय. त्यांचे काही संदर्भ हे त्या त्या काळातले आहेत. मला वाटतंय प्रबोधनाकारंच आवश्यक तेवढंच घ्यायचं आणि बाकी टाळायचं असंही करुन चालणार नाही. पहिली गोष्ट प्रबोधनकार ठाकरे तुम्हालाही परवडणार नाहीत. प्रबोधनकारांना मध्ये आणयाचंच असेल तर तुम्हालाही ते परवडणारे नाहीत.
जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडावं
ते म्हणाले की, मी दिलेल्या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये मी गेल्या ७४ वर्षांत काय गमावलं काय कमावलं याचा उहापोह केला आहे. गेल्या ७४ वर्षांत आपण वैचारिकदृष्ट्या प्रगत झालो का हा प्रश्न आहे. आपण किती वर्षे त्याच त्याच मुद्यांवर राजकारण करणार आहोत? बाबासाहेब पुरंदरेकडे मी ब्राह्मण म्हणून जात नाही तर इतिहास संशोधक म्हणून जातो. पवारांच्या भेटीला जाताना मराठा म्हणून जात नाही. महाराष्ट्र जागा व्हावा आणि पुन्हा पुन्हा त्याच जातीच्या चिखलात राजकारण व्हावं, असं मला वाटत नाही. त्यातून बाहेर पडावं, असं मला वाटतं.
निवडणुकीत फक्त ‘हे’ आरक्षण असावं
निवडणुकीमध्ये वार्डनिहाय जातीचं आरक्षण असू नये. त्यापेक्षा फक्त स्त्री आणि पुरुष यावरच आरक्षण असावं, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी तुम्ही विरोधाची भुमिका घ्याल का? याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, हे आम्ही काय ठरवणार, जे वरुन ठरतंय तसंच होतं.