पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘माळीण’ गावावर कोसळलेल्या निसर्गाच्या भीषण कोपाची सत्यकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याच्या त्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ या चित्रपटाचा थरारक टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या २४ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सत्य घटनेवर आधारित चित्रपट
वरूण राजाची प्रार्थना करून गाढ झोपेत गेलेल्या माळीण गावकऱ्यांवर त्याच रात्री मृत्यूने कसा घाला घातला, याचे अंगावर शहारे आणणारे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. दिग्दर्शक राजू राणे यांनी स्वतः माळीण गावातील वाचलेल्या ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून, या दुर्घटनेची अचूक माहिती घेऊन पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटाचे चित्रीकरण बदलापूर येथे झाले असून, कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर यांनी उभा केलेला हुबेहूब ‘माळीण गावचा सेट’ आणि उत्कृष्ट व्हीएफएक्स ही या सिनेमाची मुख्य बलस्थानं आहेत.ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन व दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे आणि अनिल नगरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच, अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांच्या आवाजातील गाणी प्रेक्षकांना भावणार आहेत.
दरड कोसळली अन् क्षणात संपलं अख्खं गाव
पुणे जिल्ह्यातील माळीण गावात मुसळधार पावसात डोंगराचा काही भाग कोसळून त्याखाली अख्खे गावच गडप झाल्याची दुर्घटना घडली होती. यात ४४ कुटुंबांतील १५१ जण माती-दगडाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. ही दुर्घटना कशी घडली, बचावकार्य कसे राबवले, गावात जिवंत राहिलेल्यांना कसा मानसिक आधार दिला आणि गावाचे पुनर्वसन कसे झाले आदी गोष्टींचा उलगडा लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

