मुंबई-टिपू सुलतानच्या नावावरुन भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. टिपू सुलतान ब्रिटिशांविरोधात लढले. त्या काळी ते ब्रिटिशांशी लढताना शहीद झाले. ते ब्रिटिशांना कधीही शरण गेले नाहीत. ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी त्याकाळी हादरवून सोडले होते.’टिपू सुलतान’ नामकरणावरुन भाजप लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहे.असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या पुढाकाराने मालाड येथील क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात येणार असल्याचे फलक परिसरात लागले होते. त्याचवेळी अस्लम शेख यांनी या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया दिली होती.
या क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन भाजप आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच भाजपने देखील नाव वापस न घेतल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे विरोधी पक्ष सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर या प्रकरणावरुन टीका करत आहेत. त्यावर मलिकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा संकुलाला ‘वीर टिपू सुलतान क्रीडा संकुल’ असे नाव देण्यात आले आहे. त्यावरुन राज्यात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते तथा मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या आमदार निधीतून हे सर्व काम पूर्णत्वास येत आहे. याचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे फलक मालवणी परिसरात लावण्यात आले होते. त्यामुळे या परिसरात वातावरण तापायला सुरुवात झाली होती. टिपू सुलतानचे नाव क्रीडा संकुलाला देण्यास आमचा विरोध आहे. हे नामकरण त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.