पुणे : पाटबंधारे विभागाने पोलिस बंदोबस्तात पाणी कपात करण्याचा निर्णय घेतल्याने यावरून आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना यामध्ये हस्तक्षेप करून ”पुणेकरांच्या पाण्यात कुठलीही कपात होणार नाही.गावांच्या समावेशामुळे पाण्याची गरज वाढली असून पुणेकरांना अधिकचे पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.” असे स्पष्ट करत दिलासा दिला . मात्र, याचवेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ११ वेळा पाणी कपातीची पत्र पाठविण्यात आली व त्यांनी धरणावरील पंप बंद केले होते याची आठवण करून देत जलसंपदा विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या पत्राचा सहारा घेऊन भाजप आणि फडणवीस राजकारण करत असल्याची टीका पाटील यांनी केली .
पुणे महापालिकेला भामा आसखेड धरणातून रोज सुमारे १६० एमएलडी पाणी मिळत असल्याने एवढेच पाणी खडकवासला धरणातून कमी केले जाणार आहे. त्यासाठी ३ डिसेंबर पासून पोलिस बंदोबस्तात पाणी कपात केली जाईल, असे पत्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला पाठविल्याने गेल्या दोन दिवसांपासून यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आज (ता. ४) जयंत पाटील यांनी सिंचन भवन येथे पत्रकार परिषद घेतली . त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेऊन पाणी कपात करू नये अशी मागणी केली.
जयंत पाटील म्हणाले, ”पुण्याला प्रति माणसी १५० लिटर याप्रमाणे पाणी दिले जात आहे. २०३१ची ७६ लाख लोकसंख्या गृहीत धरून, सध्या १४ टीएमसी पाणी कोटा मंजुर केला आहे. पण सध्या यापेक्षा जास्त पाणी पुरवठा केला जात आहे. ३४ गावांचा समावेश व लोकसंख्या वाढत असल्याने पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यात कुठलिही कपात केली जाणार नाही. पाणी कपात करण्याचा जलसंपदा विभागाचा कोणताही प्रस्ताव नाही, निर्णय झालेला नाही. उलट शहराठी जास्त पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढतच जाणार असल्याने शेती, उद्योगांनाही पाणी द्यावे लागणार आहे. थोडा जरी पाऊस कमी झाला की गंभीर स्थिती निर्माण होते. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज आहे.” असे पाटील यांनी सांगितले.
…हे श्रेय भाजपलाच
देवेंद्र फडणवीस यांनी पाणी कपात करणाऱ्यांना पुणेकर पाणी पाजतील असे वक्तव्य केले, पण मला याचे आश्चर्य वाटत आहे. त्यांच्या काळात ११ पत्र महापालिकेला देण्यात आली, एवढ्यावरच न थांबता महिनाभर पंप बंद करून पाणी कपात केली होती. महापालिका भाजपच्या ताब्यात गेल्यापासून पुणेकरांना पाण्याची चिंता वाटते याचे श्रेय मी भाजपलाच देतो, असा टोला पाटील यांनी मारला.
देवेंद्र फडणवीस हे कुसुमाग्रज यांच्याबद्दल अनादर दाखवत असतील तर हा साहित्य आणि संस्कृती समोरील सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जावी यासाठी ते सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत असतात. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा वापर साहित्य संमेलनातील राजकारणासाठी करू नये, अशा शब्दात मंत्री पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला.
नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावरून संमेलनाच्या आयोजकांना त्यांनी टोला लगावत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
जयंत पाटील म्हणाले, नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे. कुसुमाग्रज यांचा अपमान करणे म्हणजे मराठी भाषेचा, मराठी वांगमयाचा, मराठी भाषिकांचा अपमान आहे. केवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला जावी म्हणून फडणवीस सातत्याने सावरकरांचा विषय काढत असतील तर त्यांनी हे करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे.
“एका खासदारासाठी नगरसेवकांना कोणताही पक्ष धोक्यात टाकणार नाही’ कॉंग्रेसच्या पवित्र्यावर म्हणाले जयंत पाटील
महापालिका निवडणुकीत काँग्रेसला सोबत घेण्यासाठी आमचे स्थानिक पातळीवरचे नेते चर्चा करतील, त्यास आमचा पाठिंबा असेल,”असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्पष्ट केले.महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त नगरसेवक आल्यास लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादी दावा करेल यामुळे काँग्रेसचा आघाडीत येण्यास विरोध आहे का ? राष्ट्रवादीची काय भूमिका काय असेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर जयंत पाटील यांनी “एका खासदारासाठी नगरसेवकांना कोणताही पक्ष धोक्यात टाकणार नाही असे उत्तर दिले.महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र यावेत ही आमची भूमिका आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना सोबत घेतील, त्यास आमची सहमती असेल, असे पाटील यांनी सांगितले.प्रदेश पातळीवर नाना पटोले स्वबळाची भाषा करत आहेत, त्यांची समजूत काढणार का या प्रश्नावर पाटील म्हणाले, समजूत काढण्याचा प्रश्न येत नाही, वारंवार ते जर स्वबळाची भाषा करत असतील तर ते त्यांचे धोरण होते. तरी देखील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याकडे वेगळी भूमिका व्यक्त करत असतील तर ते भूमिका बदलू शकतील.”
भाजपविरोधात जे आहेत त्यांना एकत्र घेतले पाहिजे कोणालाही सोडणे बरोबर नाही. सध्या युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. महागाई, शेतकरी आंदोलन असे महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे. हीच भूमिका राष्ट्रवादीची आहे. शिवसेना आमच्यापासून दूर जावी यासाठी फडणवीस हे कायम सावरकरांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. राजकारणासाठी साहित्य संमेलनाचा वापर करणे योग्य नाही, अशी टीका फडणवीस यांच्यावर केली.
चंद्रकांत पाटलांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्याची कुठलीही घाई नाही. चंद्रकांत पाटील यांनाच घाई झाली आहे. फडणवीस यांच्या आडून तेच मुख्यमंत्री होण्याची मनीषा बाळगून आहेत. पण पक्षात आपले हितचिंतक कोण आहेत हे फडणवीस चांगली माहिती असल्याचा टोला जयंत पाटील यांनी यावेळी मारला