पुणे: केंद्र सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही इंजिनच खराब झाले आहे अशी बोचरी टीका केंद्रातील मंत्रिमंडळ बदलावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मात्र आमच्या महाविकास आघाडी सरकारची गाडी पण चांगली आणि ड्रायव्हरपण चांगला आहे असेही ते म्हणाले.यावेळी शहराध्यक्ष रमेश.बागवे, सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार शरद रणपिसे,माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी तसेच आजीमाजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुण्यात काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांबरोबर बोलताना पटोले म्हणाले, भाजपाची संस्कृतीच खोटे बोलण्याची आहे. मोदी सत्तेवर आले ते खोटे बोलूनच सत्तेवर आले आहे. परवा विधानसभेत विरोधी पक्षनेते खोटे बोलले. एकीकडे शिव्यांसाठी माफी मागतात. दुसरीकडे शिव्या दिल्याच नाही म्हणतात. त्यांचे सगळे हेच सुरू आहे असे पटोले म्हणाले.
काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा मुद्दा नाहीच, अंतर्गत लोकशाही आहे. आता सर्वांना राहुल गांधी बरोबर वाटतात. नोटाबंदी, जीएसटी, कोरोना यावर त्यांनी मांडलेले मुद्दे बरोबर असल्याचे देशाला पटू लागले आहे. देशात बदल होणार याचेच हे चिन्ह असल्याचा दावा पटोले यांनी केला.
सहकार मंत्रालयाच्या स्थापनेवर भाष्य करताना पटोले म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. मात्र त्यांना सहकाराची एबीसीडी माहिती नाही. कदाचित सहकार क्षेत्राची व्यवस्था उध्वस्त करायची म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. आधीपासूनच ते देशातील अनेक व्यवस्था ते उध्वस्त करत आहेतच. आणि मोदी सरकारने जर देशच उध्वस्त करायचा ठरवलं असेल तर काय करणार? असेही ते म्हणाले.
तसेच मुख्यमंत्री उद्गाराव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेना बळकट करत स्थानिक स्वराज्य संस्थांसह महापालिकांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा या सूचनेवर पटोले यांनी प्रतिकिया देताना म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी तयारी कराअसे जर सांगितले असेल तर त्यात वाईट काय? मात्र, याचा अर्थ मध्यावधी निवडणुका होतील असा नाही. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.
काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले नाही यावर बोलताना पटोले यांनी राज्य सरकारने आयोजित करण्यात आलेले हे पावसाळी अधिवेशन दोनच दिवसांचे होते असे सांगितले. पण आमच्या महाविकास आघाडी सरकारचे इंजिन पण आणि ड्रायव्हरपण चांगले आहे असेही पटोले यांनी सांगितले.
ईडी, सीबीआयसारख्या देशातील महत्वाच्या संस्थांना मोदी यांनी चिल्लर करून टाकले आहे. ते काय करतील सांगता येत नाही. त्यामुळेच भाजपा सोडला. तिथे स्वायत्ता नाही. राज्यातही तिथे गेलेले अनेकजण लवकरच परतताना दिसतील असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.