पुणे : महापालिकांच्या विकासास चालना मिळावी आणि धोरणात सातत्य रहावे याकरिता आयुक्तपदाचा कालावधी पाच वर्षांसाठी असावा. अशा मागणीचे पत्र महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
महापालिका आयुक्त पदावर शासनाकडून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. त्यांचा निर्धारित कालावधी तीन वर्षांचा असतो. तीन वर्षातील वर्ष-दीड वर्षाचा कालावधी शहराच्या समस्या समजून घेण्यात जातो. त्यानंतर नियोजनपूर्वक विकासकामाला लागेपर्यंत तीन वर्षांचा कालावधी संपून जातो. नवीन आलेले आयुक्त यांचाही वेळ समस्या समजून घेण्यात जातो, कधी-कधी कामांचा प्राधान्यक्रम बदलला जातो आणि त्यातून शहर विकासाचा बट्ट्याबोळ होतो. मोठ्या शहरातील विकास प्रकल्प राबविण्यासाठी आयुक्तांना किमान पाच वर्षांचा कालावधी देणे आवश्यक आहे. मोठा कालावधी मिळाल्यास आपल्या कारकिर्दीत कामाचा निकाल दाखवून द्यायचा आहे. ही भावना त्यांच्यात निर्माण होईल आणि शहर विकासासाठी ते पोषक ठरेल असे आबा बागुल यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच या सूचनेचा गांभीर्याने विचार व्हावा, व सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करावी अशी विनंती बागुल यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्र्यांना केली आहे.