पुणे– ‘धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. मात्र इतर ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे.
पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. याविषयी प्रतिक्रिया देतांना पवारांनी भाजपला टोला लगावला आहे. ‘नागपूर पदवीधर मतदारसंघ 5 दशकांपासून भाजपकडे होता. गडकरी आणि फडणवीस यांच्याकडे ही जागा गेली अनेक वर्ष होती. पुण्यातील पदवीधर मतदारांनीही आम्हाला समर्थन दिलेले नव्हते. पण यावेळी पुण्याचा निकालही मोठ्या मतांनी स्पष्ट झाला आहे. हा बदल म्हणजे महाराष्ट्रातील चित्र बदलत आहे. या बदलाला महाराष्ट्रातील लोकांचा पाठींबा आहे, असे या निकालातून दिसते’ असे पवार म्हणाले आहेत.