कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
ते म्हणाले,’कोल्हापूर ही तर मर्दांची भूमी आहे. कालच आपला कुस्तीपटू पृथ्वीराज याने महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवलेला आहे. मला स्वत:ला अभिमान आहे, की पृथ्वीराजच्या रूपाने २१ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाला. पृथ्वीराजचं मी मनापासून अभिनंदन करतोच आहे, पण लढायचं कसं आणि ते सुद्धा मर्दाने लढायचं कसं हे या कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे. तरी नशीब ही निवडणूक आहे, राजकीय पक्षांच्या जर का कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाहीए, पण कुस्तीमध्ये जर भाजपा उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी त्याच्यावरती धाडी टाकेल. सीबीआय, ईडी इत्यादींची धाड आणि मग स्वत:मध्ये धमक काही नसताना, मी जे बोललो होतो की मर्दाने मर्दासारखं लढलं पाहिजे आणि मर्दाने कसं लढायचं हे कोल्हापूरच्या मातीतून शिकलं पाहिजे.”
भारतीय जनता पार्टीने एक बनावट ‘हिंदुहृदयसम्राट’ बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांनी झिडकारले, या शब्दात ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच भाजप म्हणजे हिदुत्व नाही. भाजपला सोडले म्हणजे हिंदूत्व सोडले असे नाही. युती आम्ही नव्हे भाजपने तोडली, अमित शाह यांनी वचन मोडलं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
खोटे बोलून घोडे पुढे सरकवण्याच प्रयत्न –
कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. काल कुणीतरी सभा घेतली. त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आज मी सभा घेतलेली नाही. बोलायला काही मुद्दे नसले की खोटे आरोप केले जातात. एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं कुठे काही घोडे पुढे सरकते का हे बघायचे. त्यांची ही वाईट सवय आहे. स्वत:च्या कर्तृत्वाचे सांगण्यासारखे काही नाही. म्हणून द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करायचे आणि आपलं इप्सित साध्य करायचे, असे ठाकरे म्हणाले.
ते खोटं रेटून बोलत आहेत –
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेच. आम्ही लपूनछपून नाही, तर उघडपणे सगळं करत आहोत. आमचे सरकार प्रशासकीय गोष्टींमध्येही कुठेही कमी पडत नाही. पण, आम्ही खोटे बोलण्यात कमी पडतो. कमी पडलो तरी चालेल, पण आम्ही खोटे बोलणारच नाही. शिवरायांचे मावळे स्वत:ला समजत असल्याने खोटे बोलणे हे आमच्या रक्तात नाही. काही जण खोटे रेटून बोलत आहेत, ते रेटून बोलत असल्यामुळेच ते खरंय की काय? असे अनेकदा आपल्याला वाटतं, अशी टीका मुंख्यमंत्र्यांनी भाजपवर केली. तसेच भाजपाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जनतेच्या साक्षीने मला विचारू द्या. आमच्या कामात कुठं खोटं असेल तर जनतेसमोर आमचा पर्दाफाश करू देत असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपाला दिले.