एमआयटी डब्ल्यूपीयूत ११व्या ‘भारतीय छात्र संसदे’ चा समारोप संपन्न
पुणे“ देशात शाश्वत विकास आणि सुशासनाचे ध्येय गाठण्यासाठी उपासमार, गरीबी, शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकासारख्या समस्यांवर युवकांनी लक्ष केंद्रीत करुन ती समस्या मिटविण्याचा प्रयत्न करावा. या शिवाय देशात सुशासनाचा विचारच करु शकणार नाही.” असे मत माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री डॉ.एम. वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केले.
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय ऑनलाइन ११ व्या भारतीय छात्र संसदेेच्या समारोप समापन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते प्रकाश कारत, खासदार पद्मश्री कुमार केतकर आणि राज्यसभेचे खासदार डॉ.सस्मित पत्रा हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड आणि भारतीय छात्र संसदेचे समन्वयक रविंद्रनाथ पाटील हे उपस्थित होते.
डॉ.एम. वीरप्पा मोईली म्हणाले,“ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबरोबर अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने भारताला स्वातंत्र मिळाले. त्यामुळे हा देश इंडियाचा भारत बनला. गेल्या ७० वर्षात देशाने सामाजिक व आर्थिक प्रगती केली खरी पण आज ही भ्रष्ट्राचार आणि जाती जातीत भेदा भेद दिसून येतो. ही स्थिती बदलण्यासाठी युवकांची भूमिका खूप मोठी असणार आहे. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ही खूप मोठा झाला आहे. त्यावर तोडगा काढावा लागेल.”
“ भारतीय लोकशाही जगातील सर्वात कार्यक्षम बनविण्यासाठी तरुणांची महत्वपूर्ण भूमिका असेल. समानतेच्या भावनेवर मात करण्यासाठी जाती आणि लिंगसारख्या समस्यांवर लक्ष द्यावे लागेल. एकंदरीतच युवक हेच राष्ट्राचे रक्षक आहेत आणि तरूणांच्या सहभागाच्या घटकांमध्ये समाजाने योगदान देणे आवश्यक आहे.”
प्रकाश कारत म्हणाले,“ देशात कॉर्पोरेट्सच्या हातात मालमत्ता नियंत्रित करु देऊ नये. कारण त्यामुळे देशात आर्थिक विषमता वाढेल जी राष्ट्रीय विकासाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरु शकतो. या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही सक्षमपणे उत्तम कार्य केले आहे. याचे गंभीरपणे विश्लेषण करण्याची वेळ आली आहे. सामाजिक विषमतेचे निराकरण करण्यासाठी आपण समानतेला नाकारू शकत नाही. याचा परिणाम देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यावर होऊ शकतो.”
पद्मश्री कुमार केतकर म्हणाले,“ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्या सामाजिक संस्था उभ्या केल्या आहेत त्यांनीच आम्हाला आज ही सक्षम बनविले आहे. आयआयटी, आयआयएम यासारख्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्यामुळे सिलिकॉन व्हैली बरोबर संपूर्ण जगात देशाची बुद्धीमत्ता झळकत आहे. त्यांच्या कार्यकाळात औद्योगिक क्रांती होऊन देशाला नवी दिशा मिळाली. तसेच १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी सॅम पित्रोडा यांच्या माध्यमातून देशात संगणक क्रांती आणाली. त्यामुळे हा देश आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे. पण आजच्या काळातील जी प्रगती पाहतो त्याचे मुळ हे पंडित नेहरुंचेच आहे. आम्ही मंगळावर गेलो, इस्त्रोचे कार्य हे सर्व त्याचेच फळ आहे. आज देशात रेल्वे, एलआयसी, सार्वजनिक कंपन्यांचे जे खाजगीकरण सुरू झाले ते चुकीचे आहे. यावर जनतेलाच विचार करावा लागणार आहे.”
डॉ. सस्मित पात्रा म्हणाले,“ लोकशाही या देशाचा आत्मा आहे. याला आणखी सशक्त बनविण्यसाठी युवकांनी लोकशाहीच्या मुळाशी जाऊन तिचा अभ्यास करूण निर्णय प्रक्रियेत भाग घ्यावा. देशात विविधता असतांनाही आम्ही एक आहोत ही भावना त्यातून उद्गीगत होते. न्यायपालिका, शासन, प्रशासन आणि मिडिया या चार स्तंभाचा विस्तृत अभ्यास करावा आणि त्याचा उपयोग समाजोन्नतीसाठी करावा. वेळ, तंत्रज्ञान आणि परिवर्तन या तीन गोष्टींचे भान ठेवून युवकांनी समज कल्याणासाठी कार्य करावे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ देशात बदल आणण्यासाठी आपल्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात संसाधने, संपत्ती आणि क्षमता आहे. आता आम्हाला जवाबदारी निश्चित करण्याची गरज आहे. २१ व्या शतकात भारत हा विश्वगुरू बनेल आणि त्या दिशेने सध्या वाटचाल सुरु आहे. राजकारणात त्याग आणि समर्पण हे अत्यंत महत्वाचे आहे. चांगले नेतृत्व घडविण्याचे कार्य भारतीय छात्र संसदेच्या माध्यमातून केले जात आहे. राजकारणाला अध्यात्माचा स्पर्श असावा.”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“येणार्या काळात राजकारणाची रूपरेषा बदलणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने कार्पेरेट जगात युवक हा कंपनीचे नेतृत्व करतो तसे चित्र राजकारणात दिसत नाही. त्यासाठी कदाचित राजकीय पक्ष जबाबदार असतील. हे बदलण्यासाठी ही संसद आयोजित करण्यात आली आहे. देशातील सर्वच राज्यात याचे आयोजन केले तर नक्कीच पुढील २५ वर्षात हे चित्र बदलेल. तसेच लोकशाहीचा ढाचा पूर्णपणे बदलेल. त्याच प्रमाणे युवकांनी वसाहतवादी मानसिकता बदलण्यासाठी प्रेरित होण्याचे आवाहन केले.”
रवींद्रनाथ पाटील यांनी स्वागतपर भाषण व प्रास्ताविक केले.
प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रशंसा चावर यांनी आभार मानले.