मुंबई- सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून एफआयआर दाखल केला आहे. यासोबतच देशमुख यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यासह अनेक ठिकाणी छापेमारी केली. यापूर्वी सीबीआयने देशमुख यांची 11 तास चौकशी केली होती. त्यासोबतच संबंधित प्रकरणात देशमुख यांचे दोन स्वीय्य सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांचीदेखील 10 तास चौकशी करण्यात आली होती.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलीचा आरोप केला होता. सिंह यांनी आरोपांची सखोल चौकशी व्हावी याकरीता सर्वोच्च न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणाची सुनावणी करत सीबीआयला 15 दिवसांच्या आत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर काही वेळातच देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री ठाकरे यांच्याजवळ सोपवला होता. त्यानंतर आता सीबीआयने माजी गृहमंत्र्यांविरुद्ध एफआयआर देखील दाखल केला आहे.
केवळ परमबीर सिंह नव्हे, तर मनसुख हिरेन हत्या आणि स्फोटकांप्रकरणी अटकेत असलेला माजी पोलिस अधिकारी सचिन वाझेने सुद्धा गृहमंत्र्यांचे नाव घेतले होते. त्याने NIA चौकशीमध्ये सांगितले होते, की 6 जून 2020 रोजी त्याने ड्युटी पुन्हा जॉइन केली होती. माझ्या जॉइनिंगवर शरद पवार खुश नव्हते. त्यांनी मला पुन्हा सस्पेंड करण्यास सांगितले होते. ही गोष्ट अनिल देशमुखांनी मला सांगितली होती. त्यांनी पवार साहेबांचे मन वळवण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती. इतकी मोठी रक्कम देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी ही रक्कम मला नंतर देण्यास सांगितले होते. यानंतर माझी पोस्टिंग मुंबईच्या क्राइम इंटेलिजेंस युनिट (CIU) मध्ये झाली होती.
वाझेने सांगितल्याप्रमाणे, “जानेवारी 2021 मध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांनी मला आपल्या सरकारी बंगल्यावर बोलावले होते. त्यावेळी त्यांचा पीए कुंदन त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याचवेळी मला मुंबईतील 1650 पब, बारमध्ये जाऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 3 लाख रुपये दरमहा वसूली करण्याचे सांगितले होते. त्यावर मी मुंबईत 1650 बार नाहीत फक्त 200 आहेत असे म्हणालो होतो.” वाझे पुढे म्हणाला, मी त्यांना पैसे गोळा करण्यास नकार दिला होता. ही गोष्ट माझ्या क्षमतेत नाही असे मी त्यांना सांगितले होते. त्यावेळी पीए कुंदनने मला सांगितले होते की आपली जॉब आणि पोस्ट वाचवायची असेल तर गृहमंत्री सांगतील ते करावेच लागेल.