मुंबई-अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा आज दिवसभर फटका बसून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. एनडीआरएफसह प्रशासन चक्रीवादळाच्या आपत्तीला तोंड देत असतानाच मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजं भरकटल्याची माहिती समोर आली आहे. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली असून, यापैकी एका जहाजावर २७३, तर दुसऱ्यावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आलं आहे.
मुंबईजवळील बॉम्बे हायच्या समुद्रात तेल उत्खन्नासंदर्भात काम करणारी एक बोट तौते चक्रीवादळामुळे भरकटली आहे. या बोटीवर २७३ जण असल्याची माहिती समोर येत आहे. यापैकी अनेकजण हे कामगार आणि इंजिनियर्स असल्याचे समजते. वादळामुळे ही बोट भरकटलीय. बोटीने नांगर टाकलेल्या नसल्याने ती वादळामुळे आलेल्या वाऱ्यासोबत वाहत गेली. ही बोट बंदरामधील तसेच समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असणाऱ्या इतर बोटींना धडकण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे मुंबईच्या समुद्रामध्येच ‘जीएल कंट्रक्शन’च्या मालकीचं आणखीन एक मोठं जहाज भरकटलं असून त्यावर १३७ जण आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून ८ नॉर्टीकल मैल अंतरावर असणारं हे जहाज समुद्रात भरकटल्यानंतर त्यांनी मदतीसाठी मागणी केली असता नौदलाने आयएनएस कोलकाता ही युद्धनौका मदतासाठी पाठवली आहे.