सांगवी,पिंपळे गुरवमध्ये कचरकुंडया ‘ओव्हरफ्लो’
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपळे गुरव,सांगवी,नवी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यामधील साचलेला कचरा महापालिका कर्मचार्यांकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्यामुळे परिसरातील कचरकुंडया ओव्हरफ्लो झाल्या असून दुर्गंधीयुक्त कचर्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ना मिरवता कचरा समस्येकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.
परिसरातील वाढत्या समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजेंद्र जगताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पिंपळे गुरव येथील रामकृष्ण चौकाजवळ 60 फूटी रोडने जाताना विजयराज कॉलनी येथे रस्त्यालगत ठेवलेल्या कचराकुंडी मधील कचरा वेळेवर उचललेला नाही. त्यामुळे या ठिकाणी कचराकुंडी ओव्हरफ्लो झाल्याने नागरीकांकडून कचरकुंडीच्यालगत रस्त्यावर कचरा फेकला जात आहे. हा रस्ता नागरिकांच्या वर्दळीचा असल्यामुळे साचलेल्या कचर्यातून येणार्या दुर्गंधीचा त्रास रस्त्याने ये – जा करणार्या नागरिकांना तसेच सभोताली राहण्यास असलेल्या रहिवाश्यांना सहन करावा लागत आहे. अशाच प्रकारची कचरा समस्या नवी सांगवी येथील शनि मारुती मंदीर,मयूरनगरी सोसायटी,काटेपूरम चौक, पी डब्लुडी कॉलनी जुनी सांगवी आदी ठिकाणी निर्माण झाली असून कचरकुंडयाभोवती साचलेल्या कचर्यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे.महापालिका प्रशासनाकडून नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन परीसरातील कचराकुंड्यामधील कचरा नियमितपणे उचलला जावा, अशी मागणी त्यांनी केली.
एकिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त जिथे कचरा नाही, तिथे झाडू हातात घेऊन झाडू मारला जातो. तर दुसरीकडे शहरातील कचराकुंड्या भरून वाहत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले जात आहे. याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे भाजपाची स्वच्छता मोहीम हि केवळ दिखाव्यापुरती झाली आहे. स्थानिक नगरसेवक इतर कार्यक्रमांना हजेरी लावण्यातच व्यस्त आहेत. आपण नगरसेवक असताना नागरिकांच्या प्रश्नांना पहिले प्राधान्य असायचे. आता मात्र नागरिकांना कचरा समस्या, खड्डेमय रस्ते, डासांचे साम्राज्य अशा विविध प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी स्वच्छता अभियानाचा केवळ दिखावा न करता नागरिकांना भेडसावणार्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करायला हवा, अशी अपेक्षाही राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केली.