बेंगळुरू-कर्नाटक उच्च न्यायालयाने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदी कायम ठेवली आहे. हिजाब हा इस्लामच्या अनिवार्य प्रथेचा भाग नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर त्याचा निषेध देखील सुरू झाला आहे. कर्नाटकातील यादगीर येथील सरकारी महाविद्यालयात 35 विद्यार्थिनींनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना समजावून सांगितले आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले, मात्र विद्यार्थिनी ते मान्य न करता परीक्षा हॉलमधून निघून गेल्या.
न्यायालयाच्या निर्णयाविरोधात विद्यार्थिनींनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा केली आहे. कोर्टात अपील करणाऱ्या मुलींनी बेंगळुरू येथे पत्रकार परिषद घेऊन या निकालावर निराशा व्यक्त केली. न्यायालयाने दिलेला निकाल हा अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुलींचे वकील एम. धर म्हणाले की, कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरुन आम्ही निराश आहोत. आशा आहे की आम्हाला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल.
आम्ही आमच्या आई-वडिलांशी बोलू
न्यायालयाच्या या निकालावर त्या विद्यार्थिंनी भाष्य देखील केले आहे. ते म्हणाले की, आम्ही आमच्या आईवडिलांशी बोलू आणि त्यानंतर निर्णय घेऊ की, हिजाब न घालता वर्गात यायचे आहे की नाही. हिजाब घालूनच आम्ही परीक्षा देऊ. जर त्यांनी आम्हाला हिजाब काढायला लावले, तर आम्ही परीक्षा देणार नाही. अशी प्रतिक्रिया विद्यार्थिनींनी दिली आहे.
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे बोम्मईकडून स्वागत
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आम्ही उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. विद्यार्थ्यांसाठी शिक्षा आवश्यक आहे. सर्वच लोकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. तसेच राज्यात शांतता पाळावी. असे आवाहन बोम्मई यांनी केले आहे.
न्यायालयाच्या निकालावर ओवैसींची नाराजी
आज कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब प्रकरणावर सुनावणी पार पडली असून, कोर्टाने दिलेल्या निर्णयावर ओवेसींनी नाराजी व्यक्त केली आहे. ओवैसी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “हिजाबबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी मी असहमत आहे. या निकालाशी असहमत असणे हा माझा अधिकार असून, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात अपील करतील अशी मला आशा आहे. मला आशा आहे की केवळ AIMPLB (ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ) च नाही तर इतर धर्माच्या संघटना देखील या निर्णयाविरुद्ध अपील करतील. असे ट्विट करत ओवैसी यांनी न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.
याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात जातील का?- जलील
हिजाब प्रकरणातील निर्णय हा हार्यकोर्टाचा निर्णय आहे. याचिकाकर्ते आता सुप्रीम कोर्टात जातील का? हे पाहावे लागणार आहे. अशी प्रतिक्रिया औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.