लसीकरणासाठी गंभीर कोणी नाही -निव्वळ निर्बंधावरच वारंवार जोर -अंत नका पाहू …
पुणे- केंद्र आणि राज्याने आपापले हेवेदावे , राजकारण कोरोना प्रतिबंधक लसीकरणा बाबतीत तरी तातडीने थांबवावे आणि पुण्यासह महाराष्ट्रात घरोघरी जाऊन लसीकरण केले पाहिजे. तरच लोकांना दिलासा मिळेल व गर्दी टळेल. महामारी’चे संकट पाहता प्रत्येक व्यक्ती जगला पाहिजे. राज्य सरकारने पूर्ण लसीचा पुरवठा करून तात्काळ घरोघरी लसीकरण करावे. एकमेकांवर ढकलून वेळकाढूपणा करू नये अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा कडक निर्बंध पाळण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हि मागणी केली आहे.
ते म्हणाले,’ पुण्यात लोक पहाटे ५ वाजल्यापासून लसीकरण केंद्रावर रांगेत ‘नंबर’ लावून बसतात. Online आणि टोकन च्या लफड्यात दहा वाजता समजते की, आज लस मिळणार नाही, लसीकरण बंद आहे. ‘बास झालं लस नाही आली, केंद्र आज-उद्या बंद आहे.
लसीकरण केंद्रावर दररोज १०० लोकांना लस देऊन क्रांती होणार नाही. या पद्धतीने चालत राहिलं तर पुढची दहा वर्ष लसीकरण पूर्ण होणार नाही. वाढत्या लोकसंख्ये प्रमाण पाहता परत एकदा लोक तडफडून मरतील ही सध्याची भीतीदायक परिस्थिती आहे.सरकारला मात्र याचे भान उरलेले नाही ते आपले निर्बंधांच्या कडेकोट अंमलबजावणीसाठीच आग्रही आहे. ‘लस’ पुण्यात बनते आणि जगभर वितरीत केली जाते. मात्र पुण्यासह महाराष्ट्राला मिळत नाही, हे दुर्दैवी आहे. राजकीय कुरघोड्या बाजूला ठेवून लोकांचे जिवाचा विचार करा. राज्यात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम प्रमाणे घरोघरी जाऊन ‘लस’ देण्याचा कार्यक्रम सुरू करा. असे संतोष शिंदे यांनी म्हटले आहे.