लंडन: भारतातील बँकाचे दिवाळं वाजवून परदेशात फरार असलेला उद्योगपती विजय मल्ल्या याने संपूर्ण कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. लंडन हायकोर्टात कर्ज फेडण्यास तयार आपण तयार असून भारतात न पाठवण्याची विनंती मल्ल्याने हायकोर्टाला केली.
मनी लाँड्रिंग, कर्ज बुडवेगिरीप्रकरणात विजय मल्ल्यावर आरोप ठेवण्यात आले आहे. मल्ल्याने भारताला प्रत्यार्पण करण्याच्या आदेशाविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी दाखल याचिकेच्या सुनावणीच्या शेवटच्या दिवशी त्याने आपलं म्हणणे मांडले. भारतातील बँकांनी संपूर्ण कर्जाची रक्कम पुन्हा घ्यावी, अशी मी बँकांना वारंवार विनंती करत आहे. मात्र, ईडीकडून त्याला नकार दिला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत हा आमचा अधिकार असल्याचे सांगत ईडी बँकांना अटकाव करत असल्याचे मल्ल्याने म्हटले. एका बाजूला बँक आणि ईडी हे दोघेही एकाच संपत्तीबाबत संघर्ष करत असल्याचे मल्ल्याने हायकोर्टात नमूद केले. मागील चार वर्षांपासून ईडी आणि सीबीआय माझ्याबाबतीत करत असलेली कारवाई पूर्णत: चुकीची असल्याचे त्याने म्हटले.
ईडी, सीबीआय आणि उच्चायोगाचे एक पथक तिन्ही दिवस सुनावणी दरम्यान हायकोर्टात हजर होते. दोन न्यायाधीशांचे खंडपीठ येत्या काही आठवड्यातच आपला निकाल सुनावणार असल्याची शक्यता आहे.भारताने विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी २०१७ मध्ये प्रक्रिया सुरू केली होती. त्याला मल्ल्याने विरोध केला होता. सध्या विजय मल्ल्या जामिनावर बाहेर आहे. वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टानुसार १० डिसेंबर २०१८ रोजी त्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश देण्यात आल्यानंतर त्याने हायकोर्टात धाव घेतली होती. मल्ल्याच्या अपील याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे.
बँकांकडून घेतलेल्या ९ हजार कोटींच्या कर्जाची परतफेड करण्यास मल्ल्या असमर्थ ठरला होता. त्यानंतर दोन मार्च २०१६ रोजी त्याने भारतातून पलायन केले होते. आपण देश सोडून पलायन केले असल्याचा त्याने वारंवार इन्कार केला असून बँकांचे कर्ज फेडण्यास तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.