धर्मनिरपेक्षता हा सार्वजनिक जीवनात सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे. भरपूर चर्चा आणि वादविवाद झाल्यानंतरही ज्या विषयाची समज वाढण्याऐवजी जास्तीचा संभ्रमच निर्माण होताना दिसतो असा विषय म्हणजे धर्मनिरपेक्षता. या विषयाबाबतच्या चर्चेत सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता, निधर्मीपणा, इहवाद असे अनेक पर्यायी शब्द वापरल्याने हा संभ्रम अधिक वाढतो
भारतीय संविधानाच्या मूळ इंग्रजी प्रतीत सेक्युलॕरिज़म हा शब्द वापरला आहे ज्याचा मराठी अर्थ “धर्माशी संबंधित नसलेले” असा दिला जातो. त्याचा दुसरा अर्थ म्हणजे मृत्यूनंतरच्या म्हणजेच पारलौकिक जगाशी संबंधित नसलेले म्हणजेच इहवादी असाही घेतला जातो.
धर्म आणि राजकारणाची सांगड :
जगाच्या विविध भागात वेगवेगळ्या काळात वेगवेगळे धर्म अस्तित्वात आले. बहुतेक सर्व धर्म हे त्या त्या काळी लोकांच्या अध्यात्मिक गरजा, उपासनेची पध्दत याबाबतचे मार्गदर्शन करतानाच समाजातील सार्वजनिक व्यवहाराच्या नियमनाचे कामही करताना दिसतात. मानवी समाज विकास क्रमात सुरुवातीच्या काळात वैज्ञानिक संकल्पनांचा विकास झालेला नव्हता. त्याकाळी आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचे अर्थ माणसांना कळत नव्हते. आग लागली, वणवा पेटला, वादळ झाले, पूर आला तर अशा सर्व घटना माणसाला भयभीत करत होत्या. माणसांनी त्यांना पंचमहाभूते म्हणायला सुरुवात केली असणार. या शक्तींनी आपले नुकसान करु नये म्हणून मानव त्यांना शरण जायला लागला असणार, त्यांच्यासमोर हात जोडायला लागला असणार. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला माणसांची वस्ती विस्तारायला लागल्यावर समूहजीवनामधे किंवा सार्वजनिक व्यवहारामधे निर्माण होणारे प्रश्न सोडवण्यासाठी काही नियम तयार करणे आवश्यक झाले असणार. त्या काळात जी बोलकी मंडळी असतील किंवा पुढारपण करणारी मंडळी असतील त्यांनी सार्वजनिक जीवनात निर्माण होणारे प्रश्न सोडविण्यासाठी काही नियम बनवले असणार. पण केवळ नियम बनवले की माणसे आपोआप ते नियम पाळतात असे त्याही काळी होत नसणार. आधुनिक राज्यव्यवस्थेच्या उदयापूर्वीच्या काळात हा तिढा सोडविण्यासाठी पुढारपण करणारांनी माणसाच्या मनातील पंचमहाभूताबद्दलची भीती आणि या नियमांच्या पालनाची सक्ती यांची सांगड घातलेली असणार. एकत्रित राहत असताना कोणाच्याही अधिकारावर अतिक्रमण होवू नये, सामूहिक जीवनात शिस्त रहावी यासाठी सर्वांनी ठरलेले नियम पाळणे महत्त्वाचे मानले गेले असणार. मात्र हे घडत नाही हे लक्षात आल्यानंतर ज्या पंचमहाभूतांना माणसे घाबरून शरण जात आहेत, हात जोडत आहेत, त्यांचीच भीती घालून ठरलेले नियम पाळण्याची सक्ती केली जात असणार. यातूनच समुहजीवनासाठीची निती हळूहळू बनायला लागली असणार. धर्म आणि राजकारण यांची पहिली सांगड बहुदा इथेच अशा रितीने घडली असणार. हळूहळू त्या शक्तींना समाधानी करण्याच्या नावाखाली किंवा त्या शक्तींचा कोप शमविण्यासाठी समाजात पुढारपण करणारांनी उपासनेचे मार्ग सांगता सांगताच विविध प्रकारची कर्मकांडे करण्यासाठी इतरांना भरीला घातले असणार. असे पुढारपण करणारांमधूनच त्या त्या धर्मातील पूरोहित वर्गाचा उदय झाला असणार. मानवी जीवनाबद्दलची अनिश्चितता, त्यातून आलेली भिती, मृत्यूनंतरच जग आणि आपलं तेथील स्थान याबाबत माणसांच्या मनातील संभ्रमाचा व भितीचा फायदा घेत तत्कालीन बोलक्या किंवा पुढारपण करणाऱ्या समाजाने कष्ट न करता आपली उपजीविका भागवण्याची व्यवस्था अशा कर्मकांडांच्या माध्यमातून करुन ठेवली असणार. हे कर्मकांड पुढे चहू अंगांनी विस्तारले आणि यातूनच धर्माच्या आवरणाखाली वेगवेगळ्या अंधश्रध्दा आणि विषमतेचा पुरस्कार करणारी कर्मकांडे जोपासली गेली असणार असं मानण्यास जागा आहे.
पुढे वैज्ञानिक दृष्टीकोन हळूहळू विकसित होऊ लागला. आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या अनेक घटनांचा कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेला गती आली. ज्या घटनांना माणूस घाबरुन शरण जात होता अशा अनेक घटना कशा घडतात याची कारणमिमांसा विज्ञानाने अचुकपणे करायला सुरुवात झाली. विज्ञानाने गरुडभरारी घेतली. तंत्रज्ञान विकसित झाले. तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक उपकरणे निर्माण झाली. एखादी मयसभा वाटावी अशी विज्ञानाची सृष्टी निर्माण होऊ लागली.
मानवी जीवनातील अनिश्चितता आणि असुरक्षितता :
आज विज्ञानाने आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या अनेक घटनांचा कार्यकारणभाव शोधला आहे. पण त्याचबरोबर मानवी जीवनातील असुरक्षितता आणि अनिश्चितता कमी होण्याऐवजी अधिकच वाढलेली दिसत आहे. नोकरी-व्यवसायातील अनिश्चिततेने माणसे अस्थिर आहेतच. पण आपल्या जीवलगांच्या मृत्यूने अनेक जण सैरभैर होतात. स्वतःच्या मृत्यूनंतरच्या कल्पनेने भावव्याकूळ होतात. मृत्यू हे न टाळता येणारं वास्तव आहे हे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी पटत असलं तरी ते स्विकारण्याची तयारी नसणाऱ्या बहुसंख्य लोकांची मृत्यूनंतरच्या जगातील सुखासाठी कामना करण्याची प्रवृत्ती आजही तशीच आहे असे दिसते. माणूस जन्माला कसा येतो याबाबत विज्ञानाने तपशीलवार संशोधन करुन सर्व उलगडा केलेला आहे. पण अनेकांच्या मनात आपण जन्माला कसे आलो हा प्रश्न नसतोच. आपण जन्माला का आलो हा खरा प्रश्न त्यांच्या मनात असतो. सुख दुःखांची आणि टोकाच्या भावभावनांची अनुभूती देणाऱ्या या जगात आपले जन्माला येण्याचे प्रयोजन काय? हा प्रश्न माणसांच्या मनात सतत रुंजी घालत असतो. हा प्रश्न विज्ञानाच्या कक्षेतलाच नसल्याने विज्ञानाकडून या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा करणेच चूक आहे. मात्र सर्व धर्मांनी बहुसंख्य माणसांच्या मनातील या प्रश्नाचे एक फसवे वा उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. धर्माच्या क्षेत्रात पुढारपण करणारांनी आपल्या सोईने वा आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठीच या प्रश्नाचे एक लबाडीचे उत्तर दिलेले दिसते. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या या जगात काही अर्थ नाहीये. हे जग मिथ्या आहे. मानवी जीवनाचे खरे प्रयोजन मृत्यूनंतरच्या जगातील परमेश्वर सान्निध्य मिळवणे हेच आहे. ते फसवे उत्तर म्हणजे, “मृत्यूनंतरच्या जगात असीम कृपाळू परमेश्वराची कृपा मिळवायची असेल तर या जगात धर्माने सांगितलेल्या मार्गाने प्रामाणिकपणे वाटचाल करणे हे आपले इतिकर्तव्य आहे”. जन्नत हासिल करना, मोक्ष मिळविणे, स्वर्गप्राप्ती या सर्व संकल्पना या मानवी जीवनाचे प्रयोजन काय हे सांगण्यासाठी धर्माचे पुढारपण करणारांनी निर्माण केलेल्या फसव्या संकल्पना आहेत. याचा खरा अर्थ म्हणजे या जगातील तुमची गरीबी, तुमच्या कष्टाची चोरी, तुमचे अपमान तुम्ही तक्रार न करता सहन करावेत, त्याची कारणे शोधण्याच्या फंदात तुम्ही पडू नये एवढाच होतो. फक्त बुद्ध धम्म याबाबतीत वेगळा दिसतो. बुद्ध धम्म मृत्यूनंतरच्या जगाची चिंता करत बसण्यापेक्षा या जगात सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागावे, स्वप्रयत्नांतून आपले आयुष्य घडवावे, आपण आनंदी रहावे व इतरांनाही आनंद द्यावा यातच मानवी जीवनाची सफलता आहे अस सांगतो. बाकीच्या सर्व धर्मांनी मात्र मोक्ष, जन्नत, स्वर्ग यांच्या मोहात पाडून माणसांना या जन्मात त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे, शोषणाकडे दुर्लक्ष करायला शिकविले असे दिसते. विज्ञानाच्या सृष्टीचा आणि त्याच बरोबर आधुनिक जगातील स्वातंत्र्य व समता या संकल्पनांवर आधारित राज्यव्यवस्थेचा उदय होईपर्यंतच्या काळात धर्म हे एकाचवेळी मृत्यूनंतरच्या म्हणजेच पारलौकिक जगाशी संबंधित अध्यात्म मांडत होते, ते आभासी सुख मिळविण्यासाठी लोकांना अनेक प्रकारचे विधिनिषेध, कर्मकांड सांगत होते आणि त्याचवेळी माणसांच्या समुहजीवनात निर्माण होणाऱ्या सार्वजनिक प्रश्नांचे नियमन करत होते. आधुनिक राज्यव्यवस्था उदयाला येण्यापूर्वीच्या काळात धर्म आणि राजकारणाची फारकत करण्याच्या अर्थाने धर्मनिरपेक्षता ही संकल्पना उदयाला येण्याचे कारणच नव्हते.
अर्थात जसं बुद्ध धम्माने पारलौकिक जगाची चिंता न करता या जन्मात आनंदी बनण्याचा मार्ग दाखवला तोच इहवादी विचार समाजात रुजविण्याचा अनेक अंगांनी प्रयत्न करणारी एक प्रभावी प्रबोधन परंपरा भारतीय समाजात अस्तित्वात होतीच. चार्वाक, बुद्ध, महावीर, संत कबीर, संत तुकाराम ते आजचे म. फुले आणि डाॕ. आंबेडकर हे त्या समृध्द अशा अस्सल भारतीय विवेकी प्रबोधन परंपरेचे वाहक आहेत ज्यांनी आपल्या शिकवणीतून इहवादी विचार रुजवण्याचा प्रयत्न केला.
समाजातील बहुसंख्य माणसे जीवनातील असुरक्षितता आणि अनिश्चिततेच्या भितीने आजही धर्माचा आसरा घेऊ इच्छितात याची आणि त्याच बरोबर पूर्वीच्या काळी मानवी जीवनाची जवळपास सर्वच क्षेत्रे धर्मव्यवस्थेच्या कब्जात होती या दोन्ही वास्तवाचे भान राखून भारतीय संविधानाच्या निर्मात्यांनी संविधानात धर्मनिरपेक्ष विचारांची गुंफण केलेली दिसते. म्हणूनच धर्मनिरपेक्षतेबाबत युरोपमधून प्रसृत झालेल्या, “राजाच्या क्षेत्रात चर्चने ढवळाढवळ करायची नाही आणि चर्चच्या क्षेत्रात राजाने ढवळाढवळ करायची नाही” या सूत्रापेक्षा भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेची संकल्पना वेगळी दिसते. आणि त्याचबरोबर रशियातील एकेकाळच्या मार्क्सवादी राजवटीतील निधर्मी राजवटीपेक्षाही भारतीय संविधान वेगळी भूमिका घेताना दिसते.
धर्मनिरपेक्ष नागरिकत्व :
भारतीय संविधानाने नागरिकांना अनेक महत्वाचे कायदेशीर तसेच मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि नागरिकत्व नक्की करताना कुठेही धर्माचा संबंध मधे आणलेला नाही. 2019 सालापर्यंत भारतीय संविधानातील नागरिकत्वाबाबतच्या तरतुदी या कुठेही धर्माचा संदर्भ घेणाऱ्या नव्हत्या. फक्त 2019 साली भारत सरकारने नागरिकत्व कायद्यात केलेला बदल हा त्याला अपवाद आहे ज्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.
कलम पंचवीस :
भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेची संकल्पना खऱ्या अर्थाने स्पष्ट होते ती त्यातील पंचवीसाव्या कलमाने. पंचवीसाव्या कलमाचे मुख्यत्वे तीन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे संविधानाने नागरिकांना आपल्या इच्छेनुसार धर्मपालनाचा व प्रसाराचा अधिकार दिलेला आहे. दुसरा भाग म्हणजे नागरिकांनी सार्वजनिक शांतता, सार्वजनिक आरोग्य, सर्वमान्य नितीतत्व आणि अन्य नागरिकांचे मूलभूत अधिकार याबाबत राज्यव्यवस्थेने केलेल्या कायद्यांना अधीन राहून त्या मर्यादेतच आपले धर्मस्वातंत्र्य उपभोगायचे आहे. आणि तिसरा भाग म्हणजे संविधानपूर्व समाजव्यवस्थेत जे आर्थिक, वित्तीय वा राजकीय विषय धर्मसत्तेच्या कक्षेतील मानले गेलेले असतील अशा सर्व विषयांबाबत कायदे करण्याचा अधिकार राज्यव्यवस्थेला दिलेला आहे. हे तीनही मुद्दे नीट समजून घेतले तर भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेची संकल्पना नीट समजून घेता येते.
संविधानाच्या पंचवीसाव्या कलमाचा अर्थ स्पष्ट आहे. या कलमाचा पहिला शब्द आहे सद़्सदविवेक बुध्दीचे स्वातंत्र्य. पंचविसावे कलम नागरिकांना धर्मपालनाचा अधिकार देते तसेच व्यक्तीला धर्म न मानण्याचेही स्वातंत्र्य देते. या कलमाचा अर्थ म्हणून काही लोक “धर्म राहू द्या घरात” किंवा “आपापल्या घरात धर्मपालनाचा अधिकार” असा लावतात पण तसा अर्थ काढणे योग्य नाही. संविधानानुसार घरातील वेगवेगळ्या सदस्यांना धर्मपालनाचा अधिकार स्वतंत्रपणे मिळतो. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपल्या पसंतीप्रमाणे हा अधिकार बजावू शकते. घरातील कर्ता पुरुष आपल्या धर्म परंपरेचा भाग म्हणून आपल्या कुटुंबातील अन्य सदस्यांवर आपली मते लादू शकत नाही. वैयक्तिक जीवनात प्रत्येक नागरिक पूजा करु शकतो, नमाज पढू शकतो, येशुची भक्ती करु शकतो किंवा अन्य कुठल्याही धर्माप्रमाणे आचरण करु शकतो किंवा मला कुठल्याही धर्माशी काही देणे घेणे नाही असे म्हणायचे असेल तर तसेही म्हणू शकतो. याच पंचविसाव्या कलमानुसार दोन किंवा अनेक व्यक्तींच्या मधे निर्माण होणारे मुद्दे किंवा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी मात्र धार्मिक परंपरांची नसून संविधानाने बनवलेल्या कायद्यांची आहे. म्हणजेच जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जगाशी संबंधित जे अनेक सार्वजनिक प्रश्न किंवा मुद्दे असतील त्याबाबतीत पूर्वीच्या काळी धर्माचे काही एक म्हणणे जरी असले तरी आज धर्माचे ते मत विचारात घेतले जाणार नाही तर तिथे संविधानातील तरतुदींप्रमाणे राज्य व्यवस्थेस कायदे करण्याचा अधिकार असेल. म्हणूनच धर्माचे काहीही म्हणणे असले तरी अस्पृश्यता हा दोन किंवा अनेक व्यक्तींच्या मधील सार्वजनिक प्रश्न मानून अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा मानला जाईल व अशा व्यक्तीस शिक्षा होऊ शकते असा संविधानाचा सांगावा आहे. तसेच धार्मिक रितीरिवाजांचा दाखला देऊन कुटुंबातील महिलेसोबत कुठल्याही मुद्द्यावर जर पुरुषाने जबरदस्ती केली तर अशा पुरुषास कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षा होईल. रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत असेल तर रस्त्यात मधे येणारे कुठल्याही धर्माचे प्रार्थनास्थळ प्रशासन तेथून हटवू शकते. कोरोनाच्या महामारीत धार्मिक मिरवणुकीवर प्रतिबंध घातला जावू शकतो. थोडक्यात काय व्यक्तीला धर्मपालनाचे स्वातंत्र्य देतानाच सार्वजनिक जीवनातील धर्माच्या मर्यादा संविधानाने स्पष्ट करुन ठेवलेल्या आहेत. आणि सार्वजनिक जीवनाच्या नियमनासाठीचे कायदे करताना राज्यव्यवस्था धर्माचा विचार न करता कायदा व सुव्यवस्था, आरोग्यशास्त्र, सामाजिक शास्त्रे यांचा विचार करुन कायदे बनवेल.
वरील विवेचनावरुन हे लक्षात येईल की भारतात एकापेक्षा अधिक धर्माचे लोक रहातात म्हणून भारताला धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाची गरज आहे असे नसून एकाच धर्माचे लोक जरी भारतात रहात असते तरीही भारताला धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाची गरज आहेच.
बेचाळीसावी घटनादुरुस्ती :
काही लोक असे म्हणतात की भारतीय संविधानात आधीपासून धर्मनिरपेक्षतेचे तत्व नव्हतेच तर ते इंदिरा गांधींनी 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या प्रास्ताविकेत घुसडले. धर्मनिरपेक्षता हा शब्द राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत जरी 42 व्या घटनादुरुस्तीद्वारे आलेला असला तरी संविधानाच्या आतील पानावर धर्मनिरपेक्षतेचा आशय आधीपासून आहेच. 42 व्या घटनादुरुस्तीने संविधानाच्या आतील पानावर जे होतं ते संविधानाच्या पहिल्या पानावर आणलं गेलं इतकच. तसेही 368 व्या कलमाने वर्णन केलेल्या पध्दतीने झालेली कुठलीही घटना दुरुस्ती ही संविधानाचा भाग असतेच. शिवाय बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीला न्यायालयात आव्हान दिले गेले होते व त्यावेळी न्यायालयाने त्या घटना दुरुस्तीतील अन्य काही मुद्दे निरस्त केलेले असले तरी या दुरुस्तीला मात्र न्यायालयाने योग्य ठरवलेले आहे हे विसरता येणार नाही.
अपेक्षा नागरिकांकडून आणि राज्यव्यवस्थेकडून
संविधानातील ही संकल्पना नीट समजून घेऊन राज्यव्यवस्थेने आपला कारभार धर्मनिरपेक्ष राहील हे आवर्जून पाहिले पाहिजे. कायदे बनवताना आणि त्यांची अंमलबजावणी करताना कुठल्याही एका धर्माला झुकतं माप मिळणार नाही किंवा कुठल्याही एका धर्माची उपेक्षा राज्य करणार नाही हे तर राज्यव्यवस्थेकडून अपेक्षित आहेच. पण त्याही पुढे जावून कायदा व सुव्यवस्था राखताना, समाजाचे आरोग्य जपताना, शिक्षणातून नवी पिढी घडवताना, बालके, महिला तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांसाठी विकासाची समान संधी अस्तित्वात यावी म्हणून सामाजिक न्यायाचं धोरण अवलंबताना, कुटुंबातील स्त्री-पुरुषांचे आपापसातील संबंध नियमित करताना, भिन्नलिंगी नागरिकांचे मानवीय अधिकार जपताना, कल्याणकारी योजना राबवताना, विकासाचे प्रकल्प आणताना हे सर्व ऐहिक व या जगातले विषय आहेत हे लक्षात घेवून अशा विषयांबाबत कुठलाही एक धर्म काय सांगतो याकडे लक्ष न देता विज्ञान तसेच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मुल्ये ध्यानात घेऊनच राज्याने कारभार हाकला पाहिजे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला या जगात आनंदाने व सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था उभी करणे हे राज्यव्यवस्थेचे मुख्य काम आहे आणि हे काम पार पाडत असताना कुठल्याही एका धर्मातील परंपरा, समजुती, शिकवण ही आड येता कामा नये हे राज्यव्यवस्थेने काळजीपूर्वक पाहिले पाहिजे. नागरिकांनी ही संविधानातील धर्मनिरपेक्षतेचा आदर केला पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी धर्माचा त्याग केलाच पाहिजे असं नाही. नागरिकांना कुठलाच धर्म मानायचा नसेल तर तशी परवानगी संविधानाने दिलीच आहे. पण धार्मिक राहूनही नागरिक धर्मनिरपेक्षतेच्या मुल्याचे संवर्धन करु शकतात. आपल्या धर्मानुसार आचरण करत असताना आपल्यापेक्षा वेगळी आस्था बाळगणाऱ्यांचा तो अधिकार मान्य करणे आणि अन्य धर्मीयांच्याबद्दल द्वेषभावना न बाळगणे हे नागरिकांकडून अपेक्षित आहेच. पण सर्वात महत्वाचे म्हणजे वर उल्लेख केलेल्या इहवादी विषयांवर राज्यव्यवस्थेचा कायदे करण्याचा अधिकार त्या त्या धर्माच्या नागरिकांना मनापासून मान्य असला पाहिजे. आजच्या जगात प्रत्येकाला सुखाने व सन्मानाने जगता यावे हे राज्यव्यवस्थेचे कर्तव्य पार पाडले जात असताना कुठल्याही एका धर्माच्या समजुती, परंपरा, विश्वास याच्या पलीकडे राज्यव्यवस्थेला जावे लागेल. अवैज्ञानिक आणि विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या धार्मिक परंपराची प्रसंगी चिकीत्सा राज्यव्यवस्थेला करावी लागेल. वैयक्तिक जीवनात आपापल्या धर्माप्रमाणे आचरण करताना राज्याचा हा अधिकार मान्य करणे म्हणजे आपण धर्मनिरपेक्ष नागरिक असतो.
आजची परिस्थिती मात्र एकदम विपरीत आहे. धर्मासाठी काम करणाऱ्या बहुसंख्य संघटना आपल्या धर्मातील चांगल्या बाबी समाजात रुजवायचा प्रयत्न करण्याऐवजी आपल्या धर्माचा अतिरेकी अभिमान रुजवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अतिरेकी अभिमान हा नेहमीच कुणाच्या तरी द्वेषावर उभा असतो त्यामुळे त्यासोबत इतर धर्मीयांचा द्वेष शिकवणे व समाजात विखार रुजवणे हा अशा कट्टर धार्मिक संघटनांचा प्राधान्याचा कार्यक्रम बनलेला असतो. कुठल्याही धर्मात नैतिक शिकवणीचा काही शाश्वत भाग असतो तसेच धर्माचे पुढारपण करणारांनी रुजवलेल्या परंपराही असतात. या परंपरा कालसापेक्ष असु शकतात ज्या कालानुरुप बदलाव्या लागतात. बदलू शकतात. अनेक परंपरा तर धर्माचे पुढारपण करणाऱ्या पूरोहितवर्गाने आपले हितसंबंध सुरक्षित राखण्यासाठीच रुजवलेल्या असतात. आता काळ बदललाय. माणसे आता या जगातल्या सुखासाठी अधिक धडपडताना दिसत आहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मुल्यांवर उभे असलेले संविधान प्रमाण मानून राज्यव्यवस्थेने काम करणे अपेक्षित आहे. हे करताना अवैज्ञानिक व विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या परंपरांची चिकीत्सा राज्यव्यवस्थेला करावीच लागणार. आपल्या धर्माबद्दलचा अतिरेकी अभिमान रुजवणाऱ्या संघटनांचे मुखंड हे होऊ देत नाहीत. त्यातून संघर्ष उफाळतात. देशाचे ऐक्य धोक्यात येते. भारत हा तुमचा, माझा, आपल्या सर्वांचा देश आहे. आपला भारत समृध्द बनावा, सर्वांना न्याय देणारा बनावा यात आपल्या सर्वांचे हित आहे. हे करायचे असेल तर सर्व नागरिकांनी संविधानातील धर्मनिरपेक्षतेचे सूत्र नीट समजून घेऊन अंगिकारले पाहिजे, आचरणात आणले पाहिजे. वैयक्तिक जीवनात आपल्या इच्छेप्रमाणे धार्मिक आचरण करणारांनी सार्वजनिक जीवनात मात्र आपली “भारतीय” ही ओळख अधिक ठसठशीत बनवली पाहिजे. वैयक्तिक जीवनात आपापल्या धर्मग्रंथांचा आदर बाळगतानाच कुठल्याही दोन नागरिकांच्या मधे निर्माण होणारे प्रश्न सोडविताना ते मात्र संविधानाने बनवलेल्या कायद्यांच्या आधारेच सोडविले जातील हे मनापासून स्विकारले पाहिजे. नागरिकांनी धर्मनिरपेक्ष कार्यक्रमांमधे आपला अधिक सहभाग नोंदवला पाहिजे. पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून गावातील वा वाॕर्डातील सर्व जाती-धर्माच्या स्त्री-पुरुषांनी काढलेला मोर्चा हा धर्मनिरपेक्ष मोर्चा असतो. सर्वांना समान व चांगले शिक्षण सरकारी व्यवस्थेतून मिळावे यासाठी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी काढलेला मोर्चा हा धर्मनिरपेक्ष मोर्चा असतो. सर्व बेरोजगार युवती-युवकांनी रोजगाराच्या अधिकारासाठी काढलेला मोर्चा धर्मनिरपेक्ष असतो. तसच दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, संविधानदिन हे राष्ट्रीय सण सर्व भारतीयांचे उत्सव बनावेत यासाठी आयोजिलेले कार्यक्रम हे धर्मनिरपेक्ष कार्यक्रम असतात. अशा कार्यक्रमांमधे आपली उपस्थिती वाढली पाहिजे. धर्मनिरपेक्षतेची केवळ चर्चा करुन धर्मनिरपेक्षता रुजणार नाही तर अशी धर्मनिरपेक्ष आंदोलने व धर्मनिरपेक्ष कार्यक्रमांतून आपण एकमेकाच्या सुख-दुःखाला जितके अधिक बांधील बनू तितक्या वेगाने भारतीय समाजात धर्मनिरपेक्षता रुजायला सुरुवात होईल. आपण भारतीय नागरिक हे नक्की करुया कारण तेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे. पण हे सर्व करताना खरा धर्म म्हणजे नेमकं काय हे ही आपण समजून घेऊया.
खरा धर्म :
वरती लेखामधे ‘आध्यात्मिक उन्नती’ हा शब्द वापरला आहे. धर्माचे पालन हे खर्या अर्थाने आपल्या मनामध्ये, स्वतःच्याच अंतरंगात झाकून बघण्याची प्रक्रिया असते. उपासना म्हणजे आत्मपरीक्षण करत आपले आचरण अधिक निर्दोष बनविण्यासाठी कधीतरी शांतपणे बसून, सृष्टीशी (निसर्गाशी) तादात्म्य साधण्याची प्रक्रिया असते. म्हणजेच उपासना ही स्वतःच्या मनाला अधिक निर्मळ आणि उन्नत बनविण्यासाठी असते. आजच्या बहुतेक धर्मस्थानांच्या भोवतीचा व्यवहार आणि बर्याच धार्मिक पुढार्यांचे फूत्कार जर ऐकले तर त्यांचा आणि नैतिक शिकवणुकीचा किंवा त्यांचा आणि आत्मिक उन्नतीचा काहीतरी संबंध आहे का असा सहज प्रश्न पडतो. जो आपले-तुपले शिकवितो, जो कुणाचा तरी द्वेष शिकवितो, जो प्रसंगी हिंसेला उद्युक्त करतो, जो केवळ पुरोहिताचे पोट भरण्यासाठी कार्यरत राहतो, तो खरा धर्म कसा काय असू शकतो? संत परंपरेने खर्या अर्थाने मानवतावादाची, उदारमतवादाची शिकवण दिली आहे. त्याचबरोबर संत परंपरेने भक्त आणि देव यांच्यातील स्वार्थरहित, निर्मळ अशा नात्याची मांडणी केली आहे. कुठल्याही प्रकारच्या मध्यस्थाविना भक्त आणि देव यांचे थेट नाते जोडणार्या साध्या-सोप्या आणि सरळ अशा उपासनेची पद्धती त्यांनी दिली आहे. ती भागवत परंपरेतील संतांनी दिली आहे तशीच सुफी संतांनी पण दिली आहे. ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ या एका ओळीत केवढा अर्थ भरला आहे. मी शेतकरी आहे आणि मी जर काळ्या आईच्या मशागतीत घाम गाळून कांदा, मुळा, भाजीपाला पिकवीत असेल तर मला पांडुरंगाच्या भेटीसाठी कुठलेही कर्मकांड करायची गरज नाही, किंबहुना मला पंढरीला जाण्याची पण गरज नाही, माझे काम करत असताना, काळ्या आईच्या मशागतीत घाम गाळत असताना मी पिकविलेल्या भाजीपाल्यातच माझा विठोबा मला भेटेल. प्रत्येकाने आपले काम करत राहावे, कामातच तुम्हाला तुमचा देव भेटेल. केवढी उदात्त भावना! हा खरा उपासनेचा अर्थ. या अर्थाने जर तपासले तर आज आपल्या अवतीभोवती धर्माच्या नावाने जो बाजार मांडलेला दिसतो तो म्हणजे धर्माच्या नावाने सुरू असलेला अधर्म आहे असे उद्वेगाने म्हणावे लागते. धार्मिक स्वातंत्र्याच्या कलमाची सुरुवात सद्सद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य या शब्दांनी करताना संविधान निर्मात्यांना धार्मिक आचरणाचा संतांनी सांगितलेला हा उदात्त अर्थ अपेक्षित असणार हे नक्की.