वीजपुरवठा खंडित झाला की सर्वकाही ठप्प पडण्याची स्थिती निर्माण होण्याइतपत आता विजेची गरज निर्माण झाली आहे. नव्हे वीज ही मुलभूत गरजच बनलेली आहे. घरात प्रकाश देणारा एखादा बल्ब असो की मोठमोठ्या कारखान्यातील अहोरात्र चालणारी अजस्त्र यंत्रणा, विजेशिवाय त्यांचे अस्तित्व शून्यवत आहे. केवळ विजेच्या एका बटणावर घर जसे प्रकाशमान होते तसेच कारखान्यातील अजस्त्र यंत्रणाही वेगवान गतीने सुरु होते. पण या बटणामागे असलेली भलीमोठी वीजयंत्रणा आणि या यंत्रणेच्या माध्यमातून विजेचे नियंत्रण करणारे व 24 तास अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करणारी माणसं म्हणजे महावितरणचे ‘प्रकाशदूत’ असलेले अभियंता व जनमित्र.
विजेची निर्मिती व त्यानंतर पारेषण, वितरण अशा तीन टप्प्यांत ग्राहकांच्या दारापर्यंत वीजपुरवठा केला जातो. दाटवस्तीच्या महानगरापासून ते अतिदुर्गम डोंगरदऱ्यांतील सर्व प्रकारच्या वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांना दक्ष राहावे लागते. वीज दिसत नाही. वीजयंत्रणेत काम करण्याचा कितीही वर्षांचा अनुभव असला तरी विजेशी मैत्री होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या क्षणी अनावधानाने झालेली चूकही जीवावर बेतू शकते. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रात्री-बेरात्री अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व धोकादायक आव्हाने पेलून अभियंता व जनमित्रांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कर्तव्य बजवावे लागते. वीजपुरवठा खंडित झाला की तो पूर्ववत होईपर्यंतचा प्रतीक्षा काळ हा वीजग्राहकांना नकोसा असतो, एवढी विजेची गरज प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण झाली आहे. खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या प्रकाशदुतांची तारेवरची कसरत आणि धडपड ही पावसाळ्यात तर अधिकच आव्हानात्मक असते.
वीज वितरणाच्या क्षेत्रात महावितरण ही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक कंपनी आहे. सुमारे 2 कोटी 53 लाख ग्राहकांना वीजसेवा देणाऱ्या महावितरणच्या सुमारे 62 हजार अभियंता, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर 24 तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह इतर ग्राहकसेवा देण्याची जबाबदारी आहे. यात विविध ग्राहकसेवांसह देयकांची, थकबाकीची वसुली करणे, वीजपुरवठा खंडित करणे, वीजचोऱ्या पकडणे आदी महत्वाची कामे करावी लागतात.
महाराष्ट्रात विजेचे भारनियमन संपुष्टात आल्यानंतर आता उत्कृष्ट तसेच जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची ग्राहकसेवा सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न महावितरणकडून वेगाने सुरु झालेले आहे. वीजबिल भरणा, नवीन वीजजोडणी, ग्राहक तक्रार आदी महत्वाच्या सेवांची सुविधा महावितरणने मोबाईल अॅप किंवा महावितरणच्या वेबसाईटद्वारे एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेली आहे. याशिवाय ग्राहकांना मोबाईलवर एसएमएसद्वारे वीजबिल, वीजबंद व इतर माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मोबाईल अॅपद्वारे मीटर रिडींग घेतले जात असल्याने वीजबिलातही अचूकता आलेली आहे.
महावितरणच्या ग्राहकसंख्येत दरवर्षी सुमारे 10 लाखांची भर पडत आहे. सोबतच विजेची मागणीही सुमारे 10 टक्क्यांनी वाढत आहे. सुमारे 10 लाख 14 हजार किलोमीटरच्या उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या अन् सुमारे 5 लाख 83 हजार वितरण रोहित्रांच्या यंत्रणेतून राज्यातील अडीच कोटींपेक्षा अधिक वीजग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येत आहे. उन, वारा, पाऊस किंवा अवेळी येणारे वादळ अशा कोणत्याही परिस्थितीत उघड्यावरील वीज वितरण यंत्रणा सुस्थितीत आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न करावे लागतात. धोकेही असे की, जाणते किंवा अजाणतेपणी झालेली चूक वीज माफ करीत नाही आणि थेट मृत्यूच्या दारात नेते. त्यामुळे अशा वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करण्याची कामे तसे जिकिरीचे व प्रसंगी जोखमीचे सुद्धा असते.
सद्यस्थितीत सुरु असलेल्या पावसाळ्याने तर महावितरणच्या अभियंते अन् कर्मचाऱ्यांसाठी खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी चांगलेच आव्हान उभे केले. पुण्याचा ग्रामीण भाग, वसई विरार, कोल्हापूर जिल्ह्यात संततधार अतिवृष्टीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरु करण्यासाठी महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने जिगरबाज काम केले. कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात गेलेली वीजयंत्रणा, वसई विरारमध्ये वीजयंत्रणेसह उपकेंद्रांत शिरलेले पुराचे पाणी किंवा पुण्याच्या मावळ भागातील दऱ्याखोऱ्यात वादळी पावसाने तुटलेल्या तारा या सर्व प्रतिकूल परिस्थितीत वीजयंत्रणेची दुरुस्ती व वीजपुरवठा सुरु करण्याचे अत्यंत आव्हानात्मक काम यशस्वीपणे करून दाखविले.
यापूर्वीही सन 2016 मधील कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेच्या महापुरात बोटीने जाऊन वीजपुवरठा सुरळीत करण्याचे कर्तव्य महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चोखपणे बजावले होते. 2014 मधील महाराष्ट्रभर झालेल्या प्रचंड गारपीटीने तर वीजयंत्रणेचे अभूतपूर्व नुकसान झाले होते. परंतु अहोरात्र काम करून ही यंत्रणा उभारण्याचे व वीजपुरवठा सुरळीत करण्याचे कार्य ‘प्रकाशदुतां’नी यशस्वी केले. शिवाय नोव्हेंबर 2009 मधील कोकणातील ‘फयान’ वादळ असो किंवा किल्लारी परिसरातील भूकंप, नैसर्गिक आपत्तीला तोंड देत काळोखात गेलेल्या वीजग्राहकांसाठी ‘प्रकाश’ खेचून आणण्याचे काम महावितरणचे अभियंते व कर्मचारी करीत आहेत. महाराष्ट्रात वीज यंत्रणेचा भलामोठा पसारा असणाऱ्या महावितरणमध्ये अभियंता व जनमित्र यांना वेळी-अवेळी, रात्र असो की दिवस, उन असो, वादळ असो की पाऊस या सर्वच परिस्थितीमध्ये खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी संभाव्य धोके टाळून कर्तव्य पणाला लावावे लागते.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरळीत करण्यासाठीची जिगरबाज धडपड ही ‘प्रकाशदुतां’ना नवीन वीजजोडणीसाठी सुद्धा करावी लागते. पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम चांदर (ता. वेल्हे) व लगतच्या दोन वस्त्यांमधील वीजपुरवठ्यासाठी डोंगरदऱ्यात यंदाच्या मे महिन्यातील उन्हात अवघ्या 7 दिवसांत 65 वीजखांब व एक वितरण रोहित्र उभारण्यात आले. नैसर्गिक प्रतिकुलतेला आव्हान देत महावितरणच्या ‘प्रकाशदुतां’नी 46 कुटुंबांसाठी डोंगरदऱ्यातून अक्षरशः प्रकाश खेचून आणला हे विशेष.
वीजपुरवठा खंडित झाला की तक्रारकर्ते वीज कधी येईल याची प्रतीक्षा करतात. पण त्यादरम्यान महावितरणचे अभियंते आणि जनमित्र यांना विजेच्या धोकादायक आव्हानात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कसे काम करावे लागते, याची माहिती बऱ्याचदा नसते. पण वीज अभियंते आणि जनमित्र यांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही वीजसेवा देण्याची धडपड आणि अविश्रांत प्रयत्न समजून घेतले तर त्यांच्या कर्तव्य बजावण्याच्या प्रयत्नांना न्याय मिळेल, एवढे निश्चित.