पुणे-आज पुण्यात ‘दस मे बस ‘ या महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या संकल्पनेवरील उपक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आले असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला . यावेळी त्यांनी कृपा शंकर सिंह याना का भाजपात घेतले याचे कारणही सांगितले . या पत्रकार परिषदेला त्यांच्यासमवेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील महापौर मुरलीधर मोहोळ , सभागृहनेते गणेश बिडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .
फडणवीस म्हणाले, संपूर्ण देशात कलम ३७० वर काँग्रेस सोडणारे सर्वात पहिले नेते कृपाशंकर सिंह हे होते. काँग्रेस सोडल्यानंतर त्यांना २० महिन्यांनी आम्ही आमच्या पक्षात प्रवेश दिला. कोणी मतपरिवर्तन करून आमच्या पक्षात येत असेल तर आम्ही त्यांना घेतोच. एखाद्या पक्षातून आमच्या पक्षात आला किंवा आमच्या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला तर कधीतरी दुसऱ्या पक्षाबद्दल वाईट बोललाच असतो. परंतु आमच्या पक्षात आल्यावरच या चर्चा होतात,जेव्हा ते कॉंग्रेस मधून बाहेर पडले तेव्हा ते लगेच भाजपत सामील झाले नाहीत. त्यांनी २०-२१ महिने काश्मीर प्रश्नावर काम केलं आणि दोन वर्षांनी ते भाजपत सामील झाले. त्यांच्या हा प्रवेश एका पक्षातून दुसऱ्या पक्षातला नसून त्यांनी एक विचारधारा सोडत दुसऱ्या विचारधारेचा स्वीकार केला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन प्रचंड गोंधळ झाला. त्या गोंधळादरम्यान धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचे आरोपही करण्यात आले. त्या सर्व गोंधळानंतर भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सरकारला टीकस्त्र सोडले आहे. आताच विधानसभेचे पावसाळी अधिवेशन झाले. कट रचून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ओबीसींच्या मुद्द्यावर सगळी माहिती जाहीर केल्यावर अडचणीत येत असल्याचे लक्षात येताच आमचे आमदार निलंबित केले. यावरुनच सत्ताधारी पक्षांची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. मुळात, सरकारला ओबीसी आरक्षणात काहीच रस नाही. फेब्रुवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तीन चतुर्थांश निवडणुका होणार आहेत. तिथपर्यंत जर ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर त्यानंतर मिळूनही पुढील सात वर्षे काही फायद्याचे ठरणार नाही. यामुळेच, सरकार फक्त चालढकलपणा करत आहे. त्यांना फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्ट टाईमपास करायचा आहे. पण, ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर लढाई सुरूच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, मी २२ वर्षांपासून सभागृहात आहे. आणि त्याचे पूर्ण भान ठेवून आणि विश्वासाने सांगतो की, भाजपच्या एकही नेत्याने सभागृहात हाणामारी किंवा शिवीगाळ केलेली नाही. हा यावेळी वाद झाले. मात्र कोणीही नेत्याने पीठासीन अधिकाऱ्याला धक्काबुक्की व मारहाण केलेली नाही. हे सर्व सत्ताधारी पक्षाचे कपोलकल्पित कुभांड आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. मात्र, कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एमपीएससी विद्यार्थी प्रश्नांवर आवाज उठवत राहणार आहोत.
इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही
यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका केली होती. त्या टीकेवर पलटवार करताना फडणवीस म्हणाले, ते डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य काँग्रेसबद्दल बोलत असावेत. कारण, इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला केंद्रात आणि राज्यात आहे, भाजपल नाही.
अजून किती काळ विरोधी पक्षात बसणार? असे विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जितका काळ विरोधी पक्षात बसायची आज्ञा असेल तितका काळ आम्ही विरोधी पक्षात बसू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी प्रितम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांची नाराजी आणि भागवत कराड यांना मिळालेले मंत्रिपद याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आणि डॉ. भागवत कराड आम्ही दोघेही मुंडे साहेबांनी तयार केलेलं नेतृत्व आहे. याला पद दिल्याने, याला मंत्री केल्याने याला संपवायचंय वगैरे भाजपामध्ये नसतं. भागवत कराड यांना मंत्री केल्याने जेवढा आनंद मला किंवा पक्षातल्या कार्यकर्त्यांना झाला आहे. त्याच्यापेक्षा जास्त आनंद पंकजाताईंना झाला असेल. कारण भागवत कराड हे मुंडे परिवारातले आहेत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्याची संधीही देवेंद्र फडणवीस यांनी सोडली नाही. संजय राऊत पंडित आहेत असं का वाटतं तुम्हाला?, असं विचारला असता, ते सर्वज्ञ आहेत असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं काही नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.