उद्याच्या विधान परिषदेच्या निवडणुकीची चिंता नसून, हारजीत होत असते. उद्या शिवसेनाच जिंकणारच आहे. राज्यसभेत एकही मत फुटलं नाही. कोणी काय कलाकारी केली मला माहित आहे. फुटलं कोण त्यात अंदाज लावला आहे. त्याचा हळूहळू उलगडा होईल’ असं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत..अग्निपथ योजनेवरुन उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अग्निपथ योजना म्हणजे मृगजळ असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच नोकरीच्या नावाखाली पोरांची माथी फिरवत असल्याचा टोलाही लगावला . तसेच अग्निपथ म्हणजे ‘युज अँन्ड थ्रो’ योजना असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
मुंबई: शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन आज पार पडला. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवर्जुन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांचा उल्लेख केला. यावेळी विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडून तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली असल्याने दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तरीही त्यांनी कुठलेही रुसवे फुगवे न करता माझा आदेश म्हणून प्रत्येक गोष्ट मान्य केली, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.”५६ वर्षातल्या अनेक गोष्टी आजही मनात ताज्या आहेत. जेव्हा मी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाची शपथ घेतली तेव्हा एक क्षण माझ्या डोळ्यासमोर तरळला. तो म्हणजे ५६ वर्षांपूर्वीचा शिवसेनेच्या स्थापनेचा तो क्षण, शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, माँ, काका, आम्ही तीन मुलं होतो. तेव्हा वेळकाळ दिवस न बघता शिवसेनेची स्थापना करण्यात आली. त्या क्षणावेळी साक्षीदार मी आणि आणखी माझ्या कुटुंबातील एक-दोन जण असतील. माझं वय ६ वर्षांचं होतं. शिवाजी महाराज की जय म्हणून शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ फुटला. त्या नारळाच्या पाण्याचे शिंतोडे माझ्या अंगावर उडाले, तेव्हा जोश होता, गंमत होती. तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं की ते शिंतोडे मला इतकं भिजवतील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.”फार मोठी जबाबदारी, हे तेव्हा कळलेच नाही. शिवसेना प्रमुखांनंतर शिवसेनेचं काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, त्याला आपण नुसतच नाही तर कणखरपणे उत्तर देत आलो आहोत. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काही आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. त्या पिढीचे देसाई रावते पहिल्या पिढीचे शिवसेना प्रमुखाचे साथी आहेत. तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल हे स्वप्नातही येणं शक्य नव्हतं. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ मध्ये होणं हेच खूप मोठं वैभव होतं. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत, मंत्रीपद आपल्याकडे आहे. अशावेळी हे दोन्ही शिवसेनाप्रमुखांचे दोन्ही साथी, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांना पावलावरती साथ दिली. यावेळी जबाबदारी माझी आहे. मी त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाही दिली. तरीही कुठेही धुसफूस, रुसवे फुगवे न दाखवता दोघेही त्याच उमेदीने त्याच जिद्दीने जणूकाही आज हे शिवसेनेच्या प्रवेशासाठी आले आहेत, त्याच उत्साहाने ते मंचावर आहेत”, असं म्हणत त्यांनी दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांच्यासाठी कौतुकोद्गार काढले.”याला शिवसैनिक म्हणतात. स्वत:साठी स्वप्न बघणं हे सगळ्यांसाठी असतं पण दुसऱ्यासाठी स्वप्न बघणं आणि ते साकारण्यासाठी झटणं याला शिवसैनिक म्हणतात. या दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केले. मी सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत, पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘दरम्यान, शिवसेना आमदार आणि सर्व नेत्यांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी उद्याच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठिशी ठामपणे उभं राहाण्याचं आवाहन केलं. ‘उद्याची निवडणूक आमच्यात फूट पडू शकत नाही हे दाखवणारी आहे. महाराष्ट्र वेगळा विचार करू शकतो हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा माज चालत नाही हे उद्या दाखवायचं आहे. प्रत्येकाला पर्याय असतो. सत्तेचा माज हवा असेल तर जा भाजपाकडे. पण हे किती दिवस चालणार? आज मी शेर आहे, पण उद्या कुणीतरी सव्वाशेर येणार आहे. आत्ताचं राजकारण हे पावशेर आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना विरोधकांना इशारा दिला आहे. हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे.
“५६ वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत एक ठिणगी टाकली. त्यातून देशभरात जो वणवा पेटला आहे त्याचा आज वर्धापण दिन आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना आज पितृदिन असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे या देशाला बाप नाही. पण आज मी सांगू इच्छितो की हिंदुत्वाचा बाप कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे आहेत. जगभरात ज्याच्या मनात हिंदुत्व आहे तो बाळासाहेबांना बापच मानतो आणि बाप एकच असतो. आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन हिंदुत्वाचे बाप असल्याचे दिसून आले. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे, कसे आहे आणि कोणत्या दिशेने चालले आहे त्याचे कोणाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नाही,” असे संजय राऊत म्हणाले.
“आतापर्यंत फक्त ५६ वर्ष झाली आहेत पण अजून पुढे बरेच आहे हे विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे. राजकारणात काही लोकांना फार घमंड आली आहे. राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्यात एखादी जागा एकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांसाठी घालमेल सुरु आहे. पण एक जागा जिंकली म्हणून तुम्ही जग जिंकले असं होत नाही. या राज्याची सुत्रे ही शिवसेनेकडे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. त्यामुळे फार घमंड करु नका,” असा इशारा संजय राऊतांनी दिला.