मुंबई, दि. १९ जून -भारताच्या विकासासाठी व प्रगतीसाठी काय करायचे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार सक्षम आहे. जगाच्या पातळीवर भारताचे नाव उंचावण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. विविध माध्यमातून देशाला पुढे नेण्याचे काम ते करतायत. नवनवीन योजना ते आणतायत. अशीच अग्निपथ ही योजना आहे. या योजनेवर फक्त टीका करायची आणि लोकांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न करायचे, असा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या आजच्या भाषणातून दिसला, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारच्या नवीन अग्निपथ योजनेवर टिका केली, त्याला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, हातात काम नसेल, तर केवळ राम राम करण्यात अर्थ नाही, जनतेला अशी वचने द्यावीत जी पाळता येतील. मुख्यमंत्र्यांना अग्निपथ योजनेच्या मागचा उद्देशच कळलेला नाही किंवा त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे फक्त राजकीय अभिनिवेशातून टीकाटिपण्णी करणारे त्यांचे वक्तव्य आहे. अशी टिकाही दरकेर यांनी केली.
देशहिताचे, देशप्रेमाचे मुख्यमंत्र्यांनी पडलेले नाही राष्ट्रवादाशीही त्यांना पडलेले नाही. फक्त राष्ट्रवादीशी त्यांना पडलेले आहे. काँग्रेसशी पडलेय म्हणून ते अशी विधाने करीत आहेत. देशाची काळजी करण्यापेक्षा राज्याचे नेतृत्व आपल्याकडे आहे व ते कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकार्याने कसे टिकवून ठेवता येईल त्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी करावी असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे कशी गेली त्याचा विचार करा.
आतापर्यंत किती बेरोजगारांच्या हाताला काम दिले त्याचा लेखाजोखा मांडावा राज्यात किती उद्योगधंदे नव्याने आले आहेत. तेथील रोजगाराचे काय झाले.राज्यातील शेतक-यांना वचने द्यायची परंतु शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन दिलेल्या वचन पूर्तीचे काय झाले. शेतक-यांचा सातबारा कोरा झाला का.यावर मात्र मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत, असेही दरेकर यांनी सांगितले.
शतरंज का बादशाह कोण आहे हे राज्यसभेमध्ये आम्ही दाखवून दिले
जून-हिंदुत्वाचा बाप अशा वल्गना किंवा कोट्या करून तुम्ही हिंदुत्वापासून दूर गेलाय हे तुम्हाला पुसून काढता येत नाही. दुसऱ्याकडे बोटे दाखवत असताना चार बोटे आपण सत्ता उपभोगतोय त्याच्याकडे देखील असतात. शतरंज का बादशाह कोण आहे हे राज्यसभेमध्ये आम्ही दाखवून दिले, अशी रोखठोक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
आज शिवसेनेचा वर्धापनदिन पार पडला. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले की, राज्यसभेची एक जागा भाजपने जिंकली म्हणजे जग जिंकले असे नाही. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी दरेकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, संस्थाने खालसा झाली तरी राजे रजवाडे असतात त्यांचा रुबाब जात नसतो. तशा प्रकारची वक्तव्ये जर केली नाहीत तर ते अस्तित्वात आहेत हे कसे कळणार.आजही सरकारी नोकर भरतीचा बॅकलॉग भरपूर प्रमाणावर आहे. त्याचबरोबर सरकारी अंगीकृत महामंडळांमध्ये नोकर भरती आवश्यक आहे. खाजगी आस्थापनांमध्ये नवीन उद्योग बंद आहेत ते सुरू करून नोकऱ्या प्रस्थापित करणे हे सगळे विषय असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरे यांनी या विषयावर एक बैठक लावली का. एखादा कृती आराखडा करत एवढ्या लोकांना नोकरी देणारी योजना आखली का. त्याचा जनतेसमोर पाढा वाचा. टीकाटिपण्णी करण्यापेक्षा अडीच वर्षात तुम्ही काय केले.एकाही माणसाला नोकरी देण्याचे काम आपण दुर्दैवाने करू शकलो नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.