पुणे, : पुण्यात होणा-या संगीत क्षेत्रातील सर्वांत मोठ्या अशा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सावात सादरीकरण करण्यासाठीच आम्ही कलाकार ‘रियाज’ करत असतो. या व्यासपीठाची पुण्याई इतकी मोठी आहे की देशात नाही तर परदेशातही या व्यासपीठाच्या आठवणी अनेक रसिक आणि कलाकार काढतात, अशा भावना सूरबहार वादक इर्शाद खान आणि गायक पं. गणपती भट यांनी व्यक्त केल्या.
निमित्त होते ६४ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सावा अंतर्गत शिवाजीनगर येथील सवाई गंधर्व स्मारकात होणा-या ‘अंतरंग’ या कार्यक्रमाचे. दरवर्षी ‘अंतरंग’ दरम्यान प्रसिद्ध कलाकारांच्या प्रकट मुलाखतींचे आयोजन करण्यात येते. याच दरम्यान आज सूरबहार वादक इर्शाद खान आणि गायक पं. गणपती भट यांच्या मुलाखती निवेदक मंगेश वाघमारे यांनी घेतल्या.
आर्य संगीत मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना इर्शाद खान म्हणाले, “सवाई गंधर्व भीमसेन महोत्सावात सादरीकरण करणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. या व्यासपिठासारखे व्यासपीठ भारतात आणि जगात कुठेही नाही. या ‘लिजंडरी’ महोत्सवात सादरीकरणाची संधी आम्हाला मिळते आहे हे आमचे भाग्य आहे.‘’
एखादं वाद्य बनवायला खूप मेहनत आणि लगन लागते. आजचा जमाना हा इंस्टंट गोष्टींचा आहे. याचा फटका वाद्यनिर्मितीला बसत असलेला पहायला मिळतो याचे वाईट वाटते, असे मतही यावेळी इर्शाद खान यांनी व्यक्त केले. आज भारतात साज तयार होत असले तरी त्याच्या तारा या अजूनही जर्मनी मधून आणाव्या लागतात. भारतात या गोष्टी बनल्या पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोणतीही सांगीतिक पार्श्वभूमी नसताना सुरवातीला सतारवादन आणि नंतर मी गायनाकडे वळालो. गुरुंच्या आशीर्वादाने इथंवर पोहोचलो असे सांगत पं. गणपती भट यांनी आपला प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, “आज नवीन पिढी संगीत क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टीकोनामधून पाहत आहे. ते चुकीचे आहे. जोपर्यंत गुरू सांगत नाहीत तोपर्यंत कलाकाराने सादरीकरण करू नये असे मला वाटते. संगीत ही एक साधना आहे. त्यातून कलाकाराने स्वत: आनंद घ्यावा व रसिकांना आनंद द्यावा. ’’
संगीत ही एक अशी गोष्ट आहे जी कधीही संपणार नाही. ती चिरतरुण आहे. आमच्यासारखे अनेक कलाकार येतील जातील. रसिक वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या या संगीताचा रसास्वाद घेतील. त्यामुळे संगीत हा एक सागर आहोत आणि त्यासमोर आपण कोणीही नाही या भावनेने कलाकाराने वागले पाहिजे. कलाकाराला त्याची मर्यादा समजली पाहिजे कारण हे क्षेत्र समुद्रासारखे अथांग आहे, असेही मत यावेळी पं. गणपती भट यांनी व्यक्त केले.