संवाद पुणे आणि कृष्णकुमार गोयल फाउंडेशनतर्फे प्रतिकात्मक पालखी सोहळ्याचे स्वागत
पुणे : जय जय राम कृष्ण हरि नामाचा एकमुखी गजर करीत बा विठ्ठला, संपूर्ण जगावर आलेल्या कोरोनारूपी संकटाचे निवारण होऊ दे आणि पुढल्या वर्षी दर्शनाचा लाभ घडू दे आळवणी करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगत्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रतिकात्मक स्वागत आज विद्येच्या माहेर घरात करण्यात आले.
निमित्त होते ते संवाद पुणे, कृष्णकुमार गोयल फाउंडेशन आणि रामकृष्ण हरी प्रतिष्ठानतर्फे आयोजित स्वागत सोहळ्याचे. या सोहळ्यास महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे, चैतन्य महाराज आळंदीकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, संवाद पुणेचे सुनील महाजन, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, हभप संजय धुंडरे पाटील, हभप पंडित महाराज शिवकुमार, किरण साळी, हरिभाऊ चिकणे, मंदार चिकणे यांची उपस्थिती होती.
देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पुण्यात ह्या पालख्या एकत्र येतात. पण गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी वारी सोहळा झालेला नाही. त्यामुळे या वर्षीही पालखी सोहळ्याचे प्रतिकात्मक स्वागत ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथेचे पूजन करून करण्यात आले. हरिनामाचा गजर करीत पंढरपुरा नेईन गुढी माझे जिविची आवडी या अभंग गायनाने सुरू झालेला स्वागत सोहळा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी वरू सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खूण या अभंग गायनाने संपला.
कोरोना महामारीच्या संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकर निवळेल असे वाटत होते पण तसे घडले नाही. यंदाच्या वर्षीही पायी पालखी सोहळा होऊ शकत नसल्याने प्रतिकात्मक स्वागत सोहळा आयोजित करावा लागल्याचे सांगून महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, वारीचा अनुभव यंदा घेता येत नसला तरी प्रतिकात्मक स्वागत सोहळ्याने आत्मिक समाधान मिळत आहे. वारीची परंपरा खंडित झाली तरी भावना त्याच आहेत. कोरोनामुळे संपूर्ण जगावर ओढवलेले संकट लवकर टळू दे अशी विनवणी महापौरांनी विठ्ठलाच्या चरणी केली.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले, पुणे विद्यापीठ आणि महापालिकेतर्फे पालखी सोहळ्याचे पुण्यात स्वागत करण्याची परंपरा आहे. पण यंदाही पालखी सोहळा नसल्याने आयोजित केलेला प्रतिकात्मक स्वागत सोहळा मनाला समाधान देणारा आहे.
डॉ. सदानंद मोरे यांनी वारीची परंपरा कशी सुरू झाली या विषयी विवेचन करून वर्षागणिक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतून वारीमध्ये असंख्य दिंड्या सहभागी होत असल्याचे सांगितले.
कोरोनामुळे यंदाही वारील मुकावेलागत असल्याचे सांगून कृष्णकुमार गोयल म्हणाले, पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीने असंख्य वारकरी पंढरपूरला पायी जातात. वारी दरम्यान वारकर्यांची सेवा करण्याची संधी मिळते याला गेल्या वर्षीपासून मुकतो आहे.
चैतन्य महाराज आळंदीकर म्हणाले, पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येतो. अठरा पगड जातीचे लोक यात सहभागी होऊन भक्तिरसात चिंब होतात. पुढील वर्षी पायी पालखी सोहळा साजरा कराता यावा यासाठी त्यांनी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले.
प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. स्वागत निकिता मोघे यांनी केले. कुलगुरू डॉ. करमळकर, गोयल आणि महापौरांचा सन्मान डॉ. मोरे यांच्या हस्ते तुकाराम गाथा देऊन करण्यात आला. आभार मंदार चिकणे यांनी मानले.