पुणे- वंश संकल्पना वैज्ञानिक दृष्ट्या कधीच रद्दबातल झालेली असताना राखीगढी येथील ४६०० वर्षांपुर्वीच्या एका स्त्रीच्या सांगाड्यातील जनुकांवरून “आर्य हे येथलेच होते.” असा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न गैर आहे. शिवाय हा सांगाडा जेंव्हाचा आहे तेंव्हा स्वत:ला आर्य म्हणवणा-या समाजांचा व त्यांच्या वैदिक धर्माचा उदयही झाला नव्हता. इराणमध्ये वैदिक धर्म जन्माला आला व धर्मप्रसाराच्या माध्यमातून भारतात पसरला हे वास्तव असले तरी ही घटना साडेतीन हजार वर्षांपेक्षा जुनी नाही. त्या नंतरच भारतीय जनुकप्रवाहात इराणी वे स्टेपे येथील जनुकांचा प्रादुर्भाव झालेला दिसतो. डा. वसंत शिंदे व डेव्हीड राइश प्रभुतींनी सेल आणि सायंस नियतकालिकांत प्रसिद्ध केलेल्या दोन शोधनिबंधातही हेच नि:ष्कर्ष काढले आहेत. तरीही डा. शिंदे यांनी माध्यमांना माहिती देतांना आपल्याच शोधनिबंधातील निष्कर्षांना छेद देणारे दावे केले आहेत ही पुरातत्वविद्येचा अवमान करणारी खेदकारक घटना आहे असे प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि साहित्यिक संजय सोनवणी यांनी म्हटले आहे. ते आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या “सिंधू संस्कृती कोणाची? हिंदुंची की वैदिकांची?” या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.
डा. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर दावे करताना हरप्पा संस्कृतीची भाषा संस्कृत होती व वैदिक धर्म तेथे साडेचार हजार वर्षांपुर्वीच प्रस्थापित झाला होता असेही दावे केले. जनुकांवरुन कोणाचीही भाषा समजत नाही. वैदिक धर्म इराणमध्येच पारशी धर्माच्या समकक्ष स्थापन झाला याचा लिखित पुरावा ऋग्वेद तर देतोच पण पारशी धर्मीयांचा धर्मग्रंथ अवेस्ताही देतो. असे असताना आणि आपल्या शोधप्रबंधात असले कसलेही विधान नसतांना केवळ वैदिक धर्मियांच्या तुष्टीकरणासाठी माध्यमांसमोर हे अशास्त्रीय दावे करत सिंधू संस्कृती ही वैदिकांचीच निर्मिती हे जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. पुरातत्वशास्त्राच्या दृष्टीने मान्यतापाप्त विद्यापीठाच्या कुलगुरुने सांस्कृतीक राजकारणाचा भाग बनत भारताचा सांस्कृतीक इतिहास डागाळावा हे दुर्दैव आहे असेही सोनवणी म्हणाले. आपल्या भाषणात त्यांनी सेल व सायंसमधे प्रकाशित झालेले शोधनिबंध आणि आजवर सिंधू संस्कृतीवर मालकीहक्क सांगण्याच्या प्रयत्नांचा इतिहास आधाराला घेतला.
आदिम हिंदू महासंघाचे कार्याध्यक्ष सतीश पानपत्ते यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देत प्रास्ताविक केले. पत्रकार भवन, नवी पेठ येथे हे व्याख्यान संपन्न झाले.