मुंबई, दि. १५ फेब्रुवारी – आम्ही सकाळीच बोललो होतो, डोंगर पोखरून उंदीर निघणार. संजय राऊत यांची पत्रकार परिषद फुसका बार ठरणार. आपटी बार तरी बरा असतो तसे या पत्रकार परिषदेचे झाले. केवळ इवेंटबाजी करून काहीतरी मोठे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु संजय राऊत तोंडावर पुरते आपटले, अशी जोरदार टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रचंड आज पत्रकार परिषद घेतली. त्यावर प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, पत्रकार परिषदेत राऊत यांनी ईडीचे काही अधिकारी नावे, मुलीच्या लग्नाचे थातुरमातुर काहीतरी सांगितले. तुमच्या लग्नापर्यंत ते पोहोचले म्हणून राऊत यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय काढला. पण महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे तुमच्या हातात होती ना? तुम्ही किरीट सोमय्या यांच्याविरोधात तक्रार का नाही केली. यापूर्वीच त्यांना जेलमध्येही का नाही टाकले असा सवालही दरेकर यांनी उपस्थित केला.
उलट सोमय्या यांनीच पीएमसीचा बँकेचा घोटाळा बाहेर काढला. किरीट सोमय्या यांचा एक पैशाचा वशिला नाही. ते भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन कधीही तडजोड करत नाहीत. पण तुमचा तसा दावा असेल तर महाविकास आघाडीचे सरकार तुमचे आहे, गृह खातेही तुमचे आहे. तक्रार करा, चौकशी लावा, त्यांना अटक करा. पण तुमच्या आरोपातच शून्य तथ्य आहे अशी टिकाही दरेकर यांनी केली.
सत्तेतल्या पक्षाने मागणी करायची नसते. मागणी विरोधकांनी करायची असते. इथे सत्तेतला पक्ष विरोधी पक्षनेत्याच्या घरावर मोर्चा काढतो. सत्तेतला नेता विरोधी पक्षातल्या नेत्याला अटक करा, अशी मागणी करतो. याचा अर्थ सरकार तुमचे ऐकत नाही असा टोलाही दरेकर यांनी लगावला..
संजय राऊत आता थकले आहेत. एकहाती किल्ला त्यांनी लढवू अशी त्यांचा भ्रम होता. परंतु त्या भ्रमाचा भोपळा फुटला व म्हणून त्यांना सांगावे लागले की, ही शिवसेनेची पत्रकार परिषद आहे. म्हणून शिवसैनिकांना बालवावे लागले, त्यांना शक्तीप्रदर्शन करावे लागले. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नव्हते, काही ठराविक आमदार, खासदार होते, मुंबईचे शिवसैनिक कुठे दिसले नाही. नाशिकवरून शिवसैनिकांना बोलवावे लागले अशी टिकाही त्यांनी केली.
केंद्रीय तपास यंत्रणा चुकीचे करतात असा तुमचा दावा असेल तर तुम्हाला न्यायालयात जाण्यापासून कोणी अडवले. आपल्याला चुकीचे वाटते तर ते न्यायालयात संबंधित दोषींविरुध्द आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर असते. पण यांना फक्त इवेंटबाजी करायची आहे. भावनिक वातावरण निर्माण करायचे आहे. आपल्या अंगाशी आलेल्या प्रकरणावरुन जनतेचे लक्ष दुसरीकडे कसे वळवायचे याच्या पलीकडे त्यांच्या बोलण्यात काडीमात्र तथ्य नाही, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद केवळ आरोपापुरती होती. सरकार स्थापन करण्यामध्ये मुख्य भूमिका संजय राऊत यांची होती हे सर्वश्रृत आहे. सत्तेसाठी शरद पवार साहेबांचे मन वळवणे, आपल्या पक्षाला त्यांच्या दावणीला बांधणे हे सगळे राऊत यांनी केले आहे. त्यामुळे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना सांगितले तर तातडीने अंमलबजावणी होऊ शकते. मग मोहित कंबोजच्या विरोधात आरोप करण्यापेक्षा यापूर्वीच तक्रार वा गुन्हा का नोंद केला नाही. परंतु राऊत यांना तक्रार करायची नाही, सत्य तपासून पाहायचे नाही. फक्त ढोल पिटण्याची व विरोधकांना केवळ दुषणे देत बसणे हेच त्यांचे आता काम असल्याचेही दरेकर यांनी सांगितले.