पुणे – सव्वाचार महिने रिक्षा बंद होत्या. त्यामुळे प्रादेशिक परिवहन मंडळाने तसे प्रमाणपत्र देवून बंद कालावधीचा विमा हप्त्याचा परतावा रिक्षा चालकांना द्यावा अशा मागणीचे पत्र आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना पाठवले आहे.
वाहन (रिक्षा) बंद असल्याचे प्रमाणपत्र संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) द्यावयाचे असते. ते प्रमाणपत्र रिक्षा चालकांना मिळाल्यास त्यांना, सव्वाचार महिन्यांचा विमा हप्त्याचा परतावा विमा पॉलिसीनिहाय परत मिळेल असे आमदार शिरोळे यांनी पत्रात म्हटले आहे.
थर्ड पार्टी विमा असेल तर रिक्षा बंदच्या कालावधीतील विमा हप्त्याची रक्कम विमा कंपनी पुढील विमा पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी त्या हप्त्यापोटी वजा करेल किंवा पुढील पॉलिसीचा कालावधी रिक्षा बंद असलेल्या काळाइतका वाढवेल. या दोन्हीपैकी एक पर्याय पॉलिसीधारक रिक्षाचालक निवडू शकतो. पूर्ण विमा असेल तर विमा कंपनी भरपाई देण्यास जबाबदार राहील. अशा तरतुदींच्या आधारे काही अटींवर रिक्षा चालकांना परतावा देता येवू शकेल. सव्वाचार महिने रिक्षा सक्तीने बंद असल्याने विमा हप्त्याचा परतावा मिळणे हा रिक्षा चालकांचा अधिकार आहे असे पत्र आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांना पाठवले असून या पत्राची प्रत उप मुख्यमंत्री, परिवहन मंत्री आणि कामगार मंत्र्यांनाही पाठवली आहे.
तसेच टाळेबंदी (लॉकडाऊन) काळात एसटी, पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांनाही दरमहा किमान वेतन मिळावे, शेतकरी कर्जमुक्तीच्या धर्तीवर पकेज देवून टाळेबंदी काळातील वाहन कर्जाच्या हप्त्यात सूट द्यावी. हप्ते वसुलीसाठी फायनान्स कंपन्यांकडून होणारा छळ थांबवावा अशाही मागण्या आमदार शिरोळे यांनी मुख्य मंत्र्यांकडे केल्या आहेत.