ओजस्वी भाषणाने प्रा. बानगुडे यांनी जिंकली श्रोत्यांची मने
पुणे : ‘एका कौतुकाच्या थापेने शिवाजी महाराज आणि माँसाहेब जिजाऊ यांनी तानाजी मालुसरेंसारखे लढवय्ये नवरत्न घडवले. ज्या समाजात कौतुकाची थाप देणारी माणसे असतात तेथे निश्चितच अशी नवरत्ने घडत असतात. या कौतुकाच्या थापेवरच उद्याचे तानाजी, मालूजी उभे राहतील, असे ठामपणे आपल्या व्याख्यानातून सांगताना प्रसिद्ध शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली .
रवींद्र चव्हाण युवा मंचातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रा. बानगुडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या ओजस्वी भाषणातून इतिहासाचे असंख्य दाखले देत त्यांनी शिवचरित्र रसिकांच्या डोळ्यासमोर उभे केले.लुई-ब्रेल अंध- अपंग विकास संस्थेच्या मुलांचा तसेच आपल्या सुरेल मृदुंग वादनाच्या माध्यामातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या तुकाराम भूमकर यांच्यासह यांचा मुलगा अमित आणि गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या नातू पार्थ अशा भूमकर कुटूंबियांच्या तीन पिढ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. घोडेस्वारीत निपुण असलेली जान्हवी कदम आणि कुस्तीमध्ये दैदीप्यमान कामगिरी करणारा सुशांत फेंगसे यांनाही या कार्यक्रमात विशेष सन्मानित करण्यात आले. यावेळी रवींद्र चव्हाण, शिवसेना गटनेते संजय भोसले , शहर संघटक अजय भोसले, नवनिर्वाचित नगरसेवक विशाल धनवडे,पल्लवी जावळे,प्राची आल्हाट, संगीता ठोसर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. बानुगडे पाटील म्हणाले की, शिवरायांच्या इतिहासात जबाबदारी व सकारात्मता हे घटक महत्त्वाचे होते. प्रत्येकजण आपापली जबाबदारी सकारात्मक पद्धतीने पार पाडत असे. सावधगिरीने पावले उचलली जात असत. त्यामुळे नुसते शिवाजी महाराज की जय असे न म्हणता त्यांचे विचार आचरणात आणा, तर स्वराज्याचे सुराज्य निर्माण होईल. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी सन्मानाने परत पाठविले होते. यावरून महाराजांना स्त्रीयांविषयी असलेल्या आदर व्यक्त होतो. आज स्त्रियांवर अन्याय-अत्याचार करणारयांनी याचा विसर पडू देऊ नये, असेही बानगुडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत जावळे आणि तेजस गाढवे यांनी केले. रवींद्र चव्हाण यांनी राबविलेल्या नेत्रदान, अवयवदान,ह्रदयशस्त्रक्रिया, एड्स जनजागृती यांसारख्या अनेक विधायक व सामाजिक उपक्रमाची माहिती यावेळी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आली.