आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका, मुनगंटीवारांच्या ‘मद्यराष्ट्र’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी भाजपला खडसावले
मुंबई-रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाबाबत घडलेल्या प्रकारावरुनही भाजपाला घेरले.“विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना एकाच वेळी उत्तर देणे शक्य नसले तरी याचा अर्थ असा नाही की त्यांनी मांडलेल्या सूचनांची आम्ही नोंद घेणार नाही. मला एका गोष्टीचे दुःख आहे की, राज्यपाल हे संवैधाणिक पद आहे. याचे महत्त्व आमच्यापेक्षा विरोधकांना जास्त माहिती आहे. पण दुर्देवाने प्रथा परंपरा पाळल्या पाहिजेत. एखाद्या गोष्टीबद्दल आक्षेप घेऊ शकतात, पण राज्याची संस्कृती आहे प्रथा-परंपरा आहे. राज्यपालांनी आपले अभिभाषण सुरु केल्यानंतर जो काही गोंधळ झाला तो राज्याच्या संस्कृतीला शोभनीय नव्हता. राज्यपाल काय बोलत आहेत ते तुम्ही ऐकून घ्यायला पाहिजे होते. त्यावेळी केलेला दाऊदचा उल्लेख आपण संपूर्ण अधिवेशनभर करत आलेला आहात. देंवेद्र फडणवीसांनी सांगितलेल्या कवितेप्रमाणे तेच ते आणि तेच ते तुम्ही केले. राज्य सरकारबद्दल आपण हक्काने राज्यपालांकडे तक्रारी नोंदवता. पण राज्याचे सरकार हे काय करत आहे याच्या प्रगतीचा आढावा राज्यपाल आपल्या समोर मांडत असतात. राज्यपालांना राष्ट्रगीतालाही थांबू दिले गेले नाही. त्यामुळे एवढा मोठा घोर अपमान आजपर्यंत देशातल्या विधानसभेत क्वचितच झाला असेल,” असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले“राज्यपालांनी माझे शासन समाज सुधारकांच्या आदर्शांचे अनुकरण करते असे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा आणि बेळगावमधील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर शाई फेकल्याच्या कृत्याचा माझे शासन तीव्र निषेध करते असे राज्यपालांच्या भाषणात होते. पलीकडे राज्य ज्यांनी भाषण होऊ दिले नाही त्यांचे असल्यामुळे राज्यपालांना बोलू दिले नाही की काय हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे. त्यानंतर त्यांनी कोविडमध्ये ऑक्सिजनची कमी असताना तो कसा मिळवला, केंद्राने हजारो किलोमीटरवरुन ऑक्सिजन आणायला लावला हे राज्यपालांच्या अभिभाषणात होते. रिकामे टॅंकर एअरलिफ्ट करुन रस्त्याने, रेल्वेने ऑक्सिजन मागवण्यात आला. रात्रंदिवस आपल्या शासनाची यंत्रणा कार्यरत होती याचा मला मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहे. यंत्रणेतील लोकांना आपण कसे वागवतो त्याप्रमाणे ते काम करत असतात,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.“शिवभोजन थाळीतून १० रुपयांमध्ये जेवण देत आहोत ही अभिनाची गोष्ट आहे. गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात जेवण मिळवून देण्याचे मोठे काम आपण करत आहोत. काही लोक आरश्यात बघितली तरी भ्रष्टाचार झाल्याचे म्हणतात. कारण त्यांच्या मते तो आरसा बनवण्यामध्ये भ्रष्टाचार झालेला दिसतो,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.“ज्यांसाठी हे करत होत ते या योजनांचा लाभ घेत आहे आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत याचेसुद्धा मला समाधान आहे. माझ्या शस्त्रक्रियेच्या काळामध्ये माझी उणिव न भासू देता सगळ्या मंत्र्यांनी उत्तम काम केले त्यांच्याबद्दलही मला समाधान व्यक्त करायचे आहे. जे झाले आहे ते झोलेले आहे आणि नाकारण्याचा नाकर्तेपणा कोणी करु नये. सुधीर मुनगंटीवार तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणालात. वाईन ही किराणा मालाच्या दुकानात नाही तर सुपर मार्केटमध्ये मिळणार आहे. आपल्या बाजूला असलेल्या मध्य प्रदेशला तुम्ही मद्यप्रदेश म्हणणार का? देशात एक लोकसंख्येमागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. तर इतर राज्यांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. हे पाहून आपल्या राज्याची बदनामी करायची हे योग्य नाही. आपण केलेला विकास राज्यपाल सांगत होते तो आपण समोर येऊ दिला नाही. याची दखल नागरिक घेत असतात. रावणाचा जीव हा त्याच्या बेंबीत होता. पण काही जणांना केंद्रात सरकार मिळालं तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. मी मुंबईत जन्मल्याने मला मुंबईचा अभिमान आहे. जे जगात सर्वोत्तम आहे ते आम्ही मुंबईत करणार. यापूर्वी महापालिकेच्या शाळांना झिडकारले जायचे. पण आज महापालिकेच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला प्रवेश मिळावा म्हणून बाहेर रांग लागलेली असते. आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी एकमेव महापालिका मुंबईची आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राममंदिरानंतर आता दाऊदच्या नावानं मतं मागणार का ?
विरोधी पक्ष दाऊद -दाऊद जयघोष करतेय, भाजप सरकार आता राममंदिरानंतर दाऊदचा विषय हाती घेणार का ? त्यांच्या नावाने मते मागणार आहे का? असा सवाल मुख्यमंत्री ठाकरेंनी उपस्थित केला.दाऊदला घरात शिरून मारा कोणी अडवले? असे सांगतानाच गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना म्हणाले होते की, दाऊदला फरफरट आणणार, मात्र आपन त्यांच्या मागे फरफरट चाललो आहे, असा टोला भाजपला लगावला आहे.बुरहान वाणीला मारल्यावर त्याच्या घरी या मेहबुबा मुफ्ती गेल्या होत्या. या विचारांच्या असतानाही तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत बसला होता. जेव्हा अफजल गुरूला फाशी देण्याचा मुद्दा आला, तेव्हा मेहबुबा मुफ्ती यांचे काय वक्तव्य होते तर अफजल गुरूला फाशी देऊ नका. तेव्हा सत्तेत भाजप त्यांच्यासोबत होता मी कडवड हिंदुत्ववादी आहे आणि राहणारच असेही उद्धव ठाकरे म्हणाले. काही न करता तुम्ही आमच्यावर आरोप करत आहात. मी प्रामाणिकपणाने सांगतो की, देशद्रोहांच्या विरोधात आम्ही आहोतच आणि त्याच्याबद्दल कुठेही दुमत होण्याचे कारण नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तर..मलिक, देशमुखांच्या मांडीला मांडी लावून भाजपवाले बसले असते
जर सकाळच्या शपथविधीचा प्रयोग यशस्वी झाला असता, तर भाजपची मंडळी देशमुख आणि नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसले असते. ईडीच्या कारवाईला मी घाबरत नाही तुरूंगात जायला मी तयार म्हणत शिवसैनिकांना छळू नका असेही मुख्यमंत्री ठाकरेंनी म्हटले.
ठाकरेंची बदनामी करायची माझ्या नातेवाईकांची बदनामी करायची, ही प्रवृत्ती वाईट आहे, अशा शब्दांत भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना नवाब मलिक हा दाऊदचा हस्तक? असे म्हणत आरोप करा, पण बिनबुडाचे आरोप करू नका असा टोला भाजपला लगावला आहे.
भाजपमध्ये गेल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो
हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये असताना त्यांना झोप लागत नव्हती, मात्र भाजपमध्ये गेल्यापासून त्यांना शांत झोप लागते. भाजपमध्ये गेल्यावर वाल्याचा वाल्मिकी होतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे. काही लोकांना केंद्रात सत्ता मिळाली असली तरीसुद्धा त्यांचा जीव मुंबईत अडकला आहे.