मुंबई – राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी एकीकडे चुरस निर्माण झाल्याने, दुसरीकडे चार आमदारांच्या मतदानाविषयी अनिश्चितता दिसून येते आहे. . कोरोना लागण झाल्याने सक्तीचे विलगीकरण, न्यायालयीन कोठडीतील आमदारांना मतदानास कायद्याची मनाई आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेले आमदार अशा विविध समस्यांनी मतदानात काहीजणांना अडथळे आलेले आहेत . कसबा पेठच्या भाजप आमदार मुक्ता टिळक,चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगतापहे आजारांनी ग्रस्त आहेत. त्यांना १० जून रोजी राज्यसभेच्या मतदानासाठी एअर लिफ्ट करून मुंबईत आणण्याचे नियोजन भाजपने केलेले आहे. अनिल देशमुख व नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे दोन माजी-आजी मंत्री मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी आहेत. लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदीप्रमाणे कैद्यांना मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे मतदानास एक दिवसाचा तात्पुरता जामीन मिळणेबाबत दोघांनी केलेल्या अर्जावर काल बुधवारी सुनावणी झाली. विशेष पीएमएलए न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून गुरुवारी निकाल होईल.राज्यसभेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवारास ४ हजार २०० मते आवश्यक आहेत. पण, सध्या ५०० मतांचे मूल्य असलेल्या ४ लोकप्रतिनिधींच्या मतदानाविषयीच अनिश्चितता असल्याने दोन्ही बाजूकडे चिंता आहे. शरद पवार यांनी बुधवारी लखनऊ ते विरार अशी फोनाफोनी केली. त्यानंतर समाजवादीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाराष्ट्राचे समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांना फोन करून आघाडीला पाठिंबा देण्याची सूचना केली. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची आघाडीच्या शिष्टमंडळाने बुधवारी विरार येथे भेट घेतली. तसेच शरद पवार यांनीदेखील ठाकूर यांना फोन केला. बहुजन विकास आघाडीचे विधानसभेत ३ आमदार आहेत.