नवी दिल्ली -कृषी बिल मंजूर करून देशातील शेती क्षेत्र बड्या उद्योगपतींच्या हातात देण्याचा केंद्र शासनाचा डाव असून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे अशी मागणी करत खासदार ॲड. राजीव सातव यांनी आपल्या वाढदिवसाची रात्र संसदेच्या आवारात व्यतीत केली .
खासदार ॲड. राजीव सातव यांचा सोमवारी ता. २१ वाढदिवस होता. मात्र वाढदिवसांच्या दिवशीही शेतकऱ्यांचा प्रश्न राज्यसभेत प्रखरतेने मांडला.केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी बिलातून किमान आधारभूत किंमत संपवून टाकणार आहे. किमान आधारभूत किंमती पेक्षा कमी दराने शेतीमाल खरेदी करू नये असे या बिलामध्ये कुठेही नमुद केले नाही. त्यामुळे आधारभूत किंमतीपेक्षाही कमी दराने शेतीमाल खरेदी झाल्यास शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहे. शेतकऱ्यांना संपवून टाकण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्राचा डाव पंजाब, चंडीगढ भागातील शेतकऱ्यांच्या लक्षात आला असून आगामी काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या लक्षात येईलच. असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .