पुणे – ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करत आठव्या राजा परांजपे महोत्सवाची सांगता झाली. २० एप्रिलला राजा परांजपे यांच्या १०७ व्या जयंतीच्या मुहूर्तावर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते जोशी यांना जीवनगौरव प्रदान करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मोहन जोशी यांची मुलाखत घेतली. यावेळी मोहन जोशी, मुक्ता टिळक, प्रवीण तरडे यांच्यासह मोहर ग्रुपचे भरत देसडला, राजा परांजपे प्रतिष्ठानचे ट्रस्टी अर्चना राणे, अजय राणे व राजा परांजपेंच्या कन्या नीला कुरूलकर हे उपस्थित होते.
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर मोहन जोशी म्हणाले, “इतक्या मोठ्या माणसाच्या नावाने सन्मान स्वीकारताना अंगावर शहारा आला. राजा परांजपे हे खऱ्या अर्थाने ग्रेट होते. त्यांना संगीताचेही उत्तम ज्ञान होते. ज्यूनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत करत आपल्या चिकाटीच्या बळावर ते एक महान दिग्दर्शक बनले. असा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी कौतुकास्पद बाब आहे.”
“एक उत्तम व दिग्गज कलाकाराच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार तितक्याच ताकदीच्या व्यक्तीला दिला जात आहे. लहानपणी राजा परांजपेंचे चित्रपट मी आवर्जून बघायचे. त्यांनी आपला काळ खऱ्या अर्थाने गाजवला”, असे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या.
भरत देसडला यावेळी बोलताना म्हणाले की राजा परांजपे यांनी चित्रपटसृष्टीवर ४० वर्षे राज्य केले. ब्लॅक अॅन्ड व्हाईटच्या जमान्यातही त्यांनी पडद्यावर सात रंग भरण्याचे काम केले.
राजा परांजपे महोत्सवाचे उद्घाटन डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी झाले होते. त्यावेळी आशुतोष गोवारीकर, मेधा मांजरेकर, महेश काळे व जितेंद्र जोशी यांना राजा परांजपे सन्मान देण्यात आला होता. यावेळी आगाशे यांच्यासह इतर मान्यवरांनी राजाभाऊंच्या आठवणींना उजाळा दिला होता.
राजा परांजपे यांच्या सोनेरी स्मृती मराठी मनात वर्षानुवर्षे टिकून आहेत. त्यांचा कार्याचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. १४ ते २० एप्रिल असा एक आठवडाभर चित्रपट रसिकांना राजा परांजपे दिग्दर्शित लाखाची गोष्ट, हा माझा मार्ग एकला, पेडगावचे शहाणे, ऊन पाऊस, गंगेत घोडं न्हालं, पुढचं पाउल व जगाच्या पाठीवर हे गाजलेले चित्रपट दाखवण्यात आले. याचसोबत इतर चित्रपट, नाटके व कार्यक्रमांचा आस्वाददेखील रसिकांनी घेतला.