मुंबई. लोकांच्या अंगावर थुंकणाऱ्या आणि पोलिस, नर्सेससोबत अश्लील वर्तन करणाऱ्या मर्कजच्या लोकांना गोळ्या घाला. त्यांच्यासाठी विशेष विभाग उभा करा अशी सतंप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली. मनसे अध्यक्षांनी शनिवारी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनच्या काळात उभ्या असलेल्या प्रश्नांवर लोकांशी संवाद साधला. सोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुक्रवारच्या भाषणावर सुद्धा टीका केली.
त्यांना गोळ्या घातल्या पाहिजे -राज ठाकरे
“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय तपासणी बंद करायला हवी. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच.” दरम्यान, राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, मुस्लिम समाजातील अनेकांची दिशाभूल केली जात आहे. मुस्लिमांचे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? असा सवाल राज यांनी केला. निवडणुकीच्या वेळी येतात ना कुणाला मतदान करावे सांगायला, मग आता या मुल्ला मौलवींनी समोर येऊन कसे वागायला हवे ते सांगायला हवे. पण ते आता कुठे आहेत? असे राज ठाकरेंनी विचारले. संशय येणारी स्थिती हे का निर्माण करतात असे विचारत कारले तुपात घोळवा, साखरेत घोळवा कडू ते कडूच राहते तसेच आहेत हे अशा शब्दांत राज ठाकरेंनी मुस्लिम धर्मगुरूंवर संताप व्यक्त केला.
मोदींवर टीका…
राज ठाकरे यांनी यावेळी पीएम नरेंद्र मोदींच्या शुक्रवारच्या भाषणावर सुद्धा खरपूस टीका केली. “लोक घरातच आहेत तर दिवे पेटवतील. मात्र पंतप्रधानांच्या भाषणातून आशेचा किरण दिसायला पाहिजे होता. देशातील रुग्णांची स्थिती काय आहे, बाकी त्यांच्यावरील उपचारांची स्थिती काय आहे, गरिबांच्या अवस्था बिकट झाली आहे, याबाबत त्यांनी भाष्य करणे अपेक्षित होते,’ असे बोलताना राज यांनी पंतप्रधानांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
आर्थिक संकट येणार, शिस्तीचे पालन करा
देशभर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन पाळला जात आहे. अशात अनेक जण बेरोजगार झाले. तर अनेकांची नोकरी संकटात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा 50 टक्क्यांवर आणले आहेत. त्यामुळे, सरकारही काही करू शकणार नाही हे लक्षात ठेवा. सर्वांनी शिस्तीत राहून खर्च करा. आर्थिक शिस्त पाळली नाही तर पुढे जाउन मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.