आज पुणे शहर आणि परिसराला पावसाने धो धो धुतले, बहुतेक रस्त्यांना नद्या नाल्यांचे स्वरूप आले होते.अनेक कार्यकर्ते याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियातून प्रसारित करत होते .पुण्याच्या प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.
रात्री, आठपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही वेळात मध्यवस्तीतील अनेक सोसायट्यांत पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. तसेच, उपनगरातील हॉटेल, सोसायट्यांमध्येही पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे काही भागात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
कात्रज भागात 142 मिमी पावसाची नोंद झाली. तर खडकवासला – 108 मिमी, वारजे – 63, कोथरूड – 67 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कात्रजमध्ये मागील 10 वर्षांतील एका दिवसात पडलेल्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील दांडेकर पुलालगतच्या वस्तीमधील नागरिकांना सानेगुरुजी शाळा व मनपा कॉलनी या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
पुणेकरांसाठी रात्र भयाची…
रात्री कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांची अक्षरशः झोप उडाली. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांत कोसळणाऱ्या पावसामुळे पुणेकरांना मागील वर्षीच्या त्या काळ्या रात्रीची आठवण झाली. पावसाच्या भीतीने अनेक पुणेकरांनी रात्र जागवून काढली.
दरम्यान नीमगांव केतकी गावातील पुराच्या वेढ्यात ५५ जण अडकले असून त्यातील ४० जणांना सुखरूपपणे बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे तर १५ जण अजूनही अडकून पडले आहेत. इंदापूरजवळ दोन जण वाहनासह वाहून गेले मात्र वेळीच मदत मिळाल्याने ते बचावले आहेत.
आंबील ओढा परिसरात पुणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि अग्निशमन दलाची पथके सज्ज मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ओढ्याच्या लगत असणाऱ्या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये आणि काही घरांमध्ये पाणी शिरले.
पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात दुपारपासून जोरदार पडत असलेल्या पावसाचे पाणी, देवा फुड मॉलसमोर रस्त्यावरून वाहू लागले आहे.सध्या पावसाचा जोर कायम असल्याने, पुढील काळात रस्त्यावर आणखी पाणी येण्याची शक्यता आहे. यामुळे इंदापूर ते भिगवण या दरम्यानचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रस्त्यावरील पाणी ओसरल्याशिवाय वाहतूक चालू करण्यात येणार नसल्याने, या मार्गावर पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवासासाठी येऊ नये, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी केले आहे.पुणे-सोलापूर महामार्गावरील डाळज क्रमांक दोन या ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावर आलेले पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर, वाहतूक सुरू करण्याबाबत विचारविनिमय केला जाणार असल्याची माहिती जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली आहे