पुणे :
‘अंकनाद’ या गणिताची गोडी लावण्याकरिता तयार करण्यात आलेल्या अॅप तर्फे थोर भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांच्या ‘लिलावती’ या ग्रंथावर आयोजित वेबिनारला शनिवारी सायंकाळी, रविवारी सकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.
या विषयावरील मासिक वेबीनार मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.१० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गणित संशोधक, अभ्यासक डॉ. सुधाकर आगरकर यांचे या महिन्यातील पहिले सत्र पार पडले.११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता पुढील सत्र झाले.वर्षभर हा उपक्रम दुसऱ्या शनीवारी, दुसऱ्या रविवारी चालणार आहे.१० एप्रिल रोजी’ भास्कराचार्यांची लीलावती :कोष्टक आणि परिभाषा’ या विषयी भास्कराचार्य यांचे विचार शनिवारी सांगितले गेले.११ एप्रिल रोजी रविवारी ‘बेरीज आणि वजाबाकी’ विषयक गोष्टी सांगितल्या गेल्या.
डॉ सुधाकर आगरकर म्हणाले,’सेकंदाच्या ३४ हजाराव्या भागापर्यंत मोजमाप करण्याची कोष्टके भारतीय गणितात होती. त्याला त्रुटी असा शब्द होता .त्रुटी ते १ हजारांचे महायुग म्हणजे १ कल्प मोजले जाऊ शकत होते. इतकी सखोल कालगणना करण्याची क्षमता होती. अशा गणिती परंपरेचे अधिष्ठान लाभल्याने लीलावती सारखे ग्रंथ निर्माण झाले. शून्य ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे.मोठ्या संख्या लिहिण्याच्या पद्धतीही भारतीय गणिताने दिलेल्या आहेत. गणिताचे पुस्तक हे चवहीन,वासहीन,रसहीन,रुक्ष असले पाहिजे हा समज भास्कराचार्यांनी लीलावती ग्रंथ लिहून दूर केला.रोमन अंकातून गुणाकार भागाकार करण्याचा विचार जरी मनात आणून बघितल्यावर अडचण लक्षात येते .
भारतीय गणिती वारसा पुढे आणण्याच्या उद्देशाने,आपल्या इतिहासात दडलेलं गणिती वैभव मांडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून ‘अंकनाद’ अॅपने पुढाकार घेतल्याची माहिती मॅप एपिक कम्युनिकेशन्स्चे संचालक मंदार नामजोशी यांनी दिली.कोणाच्याही आयुष्यातून गणित बाजूला करता येत नाही म्हणून गणिताशी मैत्री केली पाहिजे,असे ते म्हणाले. प्राची साठे यांनी प्रास्ताविक केले.मंदार नामजोशी ,निर्मिती नामजोशी,समीर बापट यांच्यासह विद्यार्थी,संशोधक,पालक सह्भागी झाले. निर्मिति नामजोशी यांनी लिलावती ग्रंथातील संस्कृत श्लोक गायले आणि डॉ. सुधाकर आगरकर यांनी त्यावर विवेचन केले
आद्य गणिती भास्कराचार्य यांच्या लीलावती या महान ग्रंथाच्या विवेचनाच्या माध्यमातून भारताला लाभलेला बुद्धिमत्तेचा वारसा रंजक पद्धतीने उलगडला गेला. आतापर्यंत अंक नादच्या माध्यमातून गणितासंबंधी विविध विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते,त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग घेतला